जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी आज दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट या तीन तालुक्यातील गावांची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला

0

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर

B1न्यूज मराठी नेटवर्क

अपर जिल्हाधिकारी चार तालुक्यांची पाहणी करणार, तर निवासी उपजिल्हाधिकारी यांनी आज माळशिरस व सांगोला या दोन तालुक्यातील गावांची पाहणी केली

भाटेवाडी येथील शेतकऱ्याच्या बांधावर जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी शेतकऱ्याच्या शेतातील पिकांचा डिजिटल क्रॉप सर्व्हे स्वतः केला

जिल्ह्यातील ११ तालुक्यांत १२ व १३ सप्टेंबरला पाहणी; दुष्काळ परिस्थितीचा अहवाल तातडीने शासनाला सादर करणार

सोलापूर : पावसातील खंड आणि कमी पावसामुळे जिल्ह्यातील काही भागांत निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहे. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी ४ सप्टेंबर रोजीच जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी व तहसीलदारांना शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेट देऊन पिकांची, पाण्याची व चारा उपलब्धतेची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांमध्ये वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांकडून दुष्काळ परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी आज दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी व धोत्री तसेच अक्कलकोट तालुक्यातील वळसंग, कोण्हाळी, कुरनूर, कुरनूर धरण परिसर, नाविंदगी या गावांना भेट देऊन दुष्काळसदृश्य परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून पिकांची सद्यस्थिती, पावसाचा खंड, जमिनीतील ओलावा, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता तसेच जनावरांसाठी चारा याबाबत सविस्तर माहिती घेतली.

शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन, ऊस, व मका या पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांनी पिकांची पेरणी कधी करण्यात आली, पाऊस शेवटचा कधी झाला, त्यानंतर किती दिवसांचा पावसाचा खंड आहे आणि जमिनीमध्ये सध्या किती ओलावा आहे, याची माहिती शेतकऱ्यांकडून घेतली. पिकांबरोबरच गावातील पिण्याच्या पाण्याची स्थिती आणि जनावरांसाठी उपलब्ध असलेल्या चारा-पाण्याचीही त्यांनी माहिती घेतली. तसेच महसूल व कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी वस्तुनिष्ठपणे दुष्काळ पाहणी करून त्वरित अहवाल सादर करण्याबाबत निर्देशित केले. जेणेकरून शेतकऱ्यांना शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळेल.

जिल्ह्यातील ११ तालुक्यांची दोन दिवसांत पाहणी
दुष्काळ परिस्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची पथके प्रत्यक्ष क्षेत्रात उतरविली आहेत. जिल्हाधिकारी यांनी आज दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील गावांमध्ये दुष्काळाची पाहणी केली. तर अपर जिल्हाधिकारी चार तालुक्यांची 13 सप्टेंबर रोजी, तर निवासी उपजिल्हाधिकारी यांनी सांगोला व माळशिरस तालुक्यातील गावांची पाहणी केली. अशा प्रकारे १२ व १३ सप्टेंबर या दोन दिवसांत जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांतील दुष्काळसदृश्य गावांची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे.

या दोन दिवसांत महसूल प्रशासनासह दुष्काळ परिस्थितीशी संबंधित सर्व विभागांचे अधिकारी त्यांच्या कार्य क्षेत्रात राहून परिस्थितीची माहिती संकलित करणार आहेत. प्रांताधिकारी, तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांकडून प्राप्त होणाऱ्या अहवालांचे संकलन करून दुष्काळ परिस्थितीचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाला तातडीने सादर करण्यात येणार आहे.500जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सांगितले की, शासनाच्या निकषांनुसार कमी पाऊस आणि पावसातील खंड हे दुष्काळ परिस्थितीचे महत्त्वाचे ट्रिगर मानले जातात. सध्या जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला, मोहोळ आणि बार्शी या चार तालुक्यांमध्ये ट्रिगर-१ व ट्रिगर-२ मध्ये येऊ शकतात. त्यामुळे संबंधित तालुक्यांतील परिस्थितीचे बारकाईने मूल्यांकन करण्यात येत आहे.

जिल्ह्यात सध्या ४२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, आगामी काळात पाऊस न झाल्यास आवश्यकतेनुसार टँकरची संख्या वाढविण्यात येऊ शकते, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

उजनी धरण १०० टक्के भरले; लघु प्रकल्पांत पाणीसाठा
उजनी धरण सध्या १०० टक्के भरलेले आहे. धरण पूर्ण भरल्यानंतर अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करून जिल्ह्यातील सुमारे ४० टक्के लघु पाणी प्रकल्प भरून घेण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे उपलब्ध जलसाठ्याचा योग्य पद्धतीने वापर करण्याबरोबरच भविष्यातील पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाकडून आवश्यक नियोजन करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी : आमदार सचिन कल्याणशेट्टी

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनीही अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. सध्या जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळ परिस्थितीची तातडीने पाहणी करून त्याचा अहवाल शासनाला पाठवावा आणि शासनाने दुष्काळाच्या निकषांनुसार शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत जाहीर करावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीची संपूर्ण पाहणी पूर्ण करून वस्तुनिष्ठ अहवाल शासनाला सादर करण्यात येईल. शासनाच्या निर्णयानुसार पात्र शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी यावेळी स्पष्ट केले.

उत्तर सोलापूर तालुक्यातील प्रताप नगर व भाटेवाडी येथील शेती पिकाची पाहणी

जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील प्रताप नगर आणि भाटेवाडी येथील शेती पिकाची पाहणी केली. येथील तुर, उडीद, सोयाबीन ऊस, मका आणि कागदी लिंबू या पिकाची पाहणी करून संबंधित शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. येथील पिकांची जून जुलैमध्ये पेरणी झालेली असून त्यानंतर पाऊस न आल्याने पिके पूर्णपणे कोमेजून जळून गेलेली आहेत. तसेच उसाची वाढ झालेली नाही, कागदी लिंबू फुलावर असताना पाऊस न आल्याने फुले लागलेली नाही अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. तसेच उसासाठी कॅनॉल मधून पाणी सोडण्याची ही मागणी केली तर अनेक शेतकऱ्यांनी उडीद तूर पिके पावसा अभावी काढून टाकलेले आहेत अशा शेतकऱ्यांनाही शासनाची मदत मिळावी अशी मागणी केली.

जिल्हाधिकारी यांनी केला स्वतः डिजिटल क्रॉप सर्व्हे
भाटेवाडी तालुका उत्तर सोलापूर येथील शेतकऱ्यांच्या शेती पिकाची पाहणी करत असताना येथील कागदी लिंबू उत्पन्न घेत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचा डिजिटल क्रॉप सर्व्हे जिल्हाधिकारी यांनी स्वतः केला.

यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, प्रांताधिकारी सुमित शिंदे, प्रांत अधिकारी सदाशिव पडदुने, दक्षिणचे तहसीलदार किरण जमदाडे, अक्कलकोट तहसीलदार विनायक नगर, उत्तर चे तहसीलदार निलेश पाटील, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत मंगरूळे, दक्षिणचे तालुका कृषी अधिकारी अवधूत मुळे यांच्यासह महसूल, कृषी, ग्रामविकास विभागाचे अधिकारी तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या