खरीप हंगाम 2026 : पावसाच्या खंडामुळे पिकांचे मोठे नुकसान; बार्शी तालुक्यात समितीकडून प्रत्यक्ष शेतपिकांची पाहणी
B1 न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : खरीप हंगाम २०२६ मध्ये बार्शी तालुक्यात सरासरीपेक्षा कमी झालेला पाऊस आणि दीर्घकाळ पडलेल्या पावसाच्या खंडामुळे शेतपिकांवर मोठा परिणाम झाल्याची पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीच्या निर्देशानुसार बार्शी तालुक्यात संयुक्त समितीमार्फत प्रत्यक्ष शेतपिकांची पाहणी करण्यात आली.
मा. आयुक्त (कृषी) तथा राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीचे अध्यक्ष यांच्या निर्देशानुसार तसेच मा. जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्या आदेशान्वये तालुक्यातील सर्व ११ महसूल मंडळांमध्ये पिकांच्या सद्यस्थितीची पाहणी सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार गठित समितीने विविध गावांमध्ये शेतात जाऊन पिकांवरील पाण्याचा ताण, पावसाच्या खंडाचा परिणाम आणि संभाव्य नुकसानीची माहिती संकलित केली.
पाहणी समितीमध्ये या सदस्यांचा समावेश
- सदाशिव पडदुणे – उपविभागीय अधिकारी तथा अध्यक्ष, तालुकास्तरीय दुष्काळ देखरेख समिती
- एफ. आर. शेख – तहसीलदार, बार्शी
- एस. एस. कोयले – तालुका कृषी अधिकारी
- विवेक जमदाडे – गटविकास अधिकारी
- उमाकांत शंकर भोंडटे – राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त प्रगतिशील शेतकरी
- विनोद शिवाजी धुमाळ – राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त प्रगतिशील शेतकरी
- पी. ए. गोजारी – शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर
यावेळी संबंधित गावांचे ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, प्रतिष्ठित नागरिक आणि शेतकरी उपस्थित होते. तसेच सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांनीही पाहणी दौऱ्यात सहभाग घेतला.
आज पाहणी करण्यात आलेली गावे
अलिपूर, पिंपळगाव धस, घारी–पुरी, उपळाई ठोंगे, कुसळंब, धोत्रे, पानगाव, वैराग, मालेगाव, उपळे दुमाला आणि काळेगाव या गावांमध्ये प्रत्यक्ष शेतपिकांची पाहणी करण्यात आली.
शासनाकडे अहवाल सादर होणार
समितीने संकलित केलेली वस्तुनिष्ठ माहिती वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात येणार असून शासनाच्या प्रचलित निकषांनुसार आवश्यक ती कार्यवाही व पुढील पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार एफ. आर. शेख यांनी दिली.




