बार्शीत LIC च्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य विमा जनजागृती रॅली उत्साहात संपन्न; पथनाट्याने वेधले नागरिकांचे लक्ष
B1 न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) ७० व्या वर्धापन दिनानिमित्त बार्शी शहरात भव्य विमा जनजागृती रॅली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सर्वसामान्य नागरिकांमध्ये विम्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सकाळी ९ ते १०.३० या वेळेत बार्शी नगर परिषदेसमोरील शिवसृष्टी येथून वरिष्ठ शाखा अधिकारी कबाडे सर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला प्रारंभ झाला. शिवसृष्टी, पांडे चौक, लोखंड गल्ली, आझाद चौक या प्रमुख मार्गांवरून रॅली मार्गक्रमण करत एलआयसी बार्शी शाखा कार्यालयाच्या आवारात दाखल झाली.
‘थँक्यू पप्पा’ पथनाट्याने जिंकली मने
रॅलीदरम्यान शहरातील प्रमुख चौकांमध्ये “थँक्यू पप्पा” आणि “विमा कशासाठी?” या विषयांवर आधारित प्रभावी पथनाट्य सादर करण्यात आले. विकास अधिकारी उन्मेष पोतदार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या पथनाट्याने नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
संतोष मोरे, सागर गुळवे, राहुल चिनके, उत्तम पोतदार, अनिता घोळवे, जयश्री पोतदार, गौरी भूमकर, संगीता माळी, विद्या पोतदार, स्वाती ढेरे, प्रांजली ढाकणे, मीनाक्षी जाधवर, विद्या ढाणे आणि स्मिता बोरा यांनी पथनाट्यात प्रभावी अभिनय सादर करून विम्याचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले.
घोषणांनी दुमदुमले शहर
जयश्री पोतदार आणि राहुल चिनके यांच्या नेतृत्वाखाली रॅलीत विम्याविषयी जनजागृती करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या. “डॉक्टर जिंदगी बचाते है, हम परिवार बचाते है”, “जो अपनों से करे प्यार, वो बीमा से कैसे करे इंकार” आणि “जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी” या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
लहानग्यांचाही उत्स्फूर्त सहभाग
या रॅलीत पांडुरंग घोलप, विष्णू तुपे, पोपट कानगुडे, स्वाती लुंगारे, कीर्ती कांबळे, प्रमिला वानकर, संध्या वाघमारे, अर्चना हामने, सुनिता जमदाडे, स्नेहा गायकवाड, सुप्रिया जाधव, विशाल जाधव, श्रावणी पोतदार, पार्वती चंद्रशेखर, कृष्णा पोतदार, अविनाश वैद्य, सारंग कुलकर्णी, राजेंद्र जाधवर, अमर कदम, सुरेश महामुनी, प्रमिला खराडे, वैष्णवी शेंडगे, स्वाती मांजरे, संजय मसुते, कपिल कांबळे यांच्यासह चि. मानव पोतदार व चि. दक्ष क्षीरसागर या लहानग्यांनीही उत्साहाने सहभाग घेतला.
ध्वनिव्यवस्थेची जबाबदारी विमा प्रतिनिधी संतोष मोरे व श्रीशैल माळी यांनी सांभाळली, तर अल्पोपहाराची व्यवस्था विठ्ठल बोकडे यांनी केली.
शाखा कार्यालयात कार्यक्रमाची सांगता
एलआयसी शाखा कार्यालयात रॅलीचा समारोप झाल्यानंतर उपस्थित कर्मचाऱ्यांसमोर पुन्हा एकदा पथनाट्य सादर करण्यात आले. त्यानंतर वरिष्ठ विकास अधिकारी सुहास शामराज सर यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन, आयोजन आणि नेतृत्व बार्शी शाखेतील टॉपर विकास अधिकारी उन्मेष पोतदार यांनी केले. ७० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या जनजागृती रॅलीने बार्शीकरांमध्ये विम्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा महत्त्वपूर्ण संदेश दिला.





