बार्शीत संजय गांधी निराधार योजना समितीची महत्त्वपूर्ण बैठक; प्रलंबित अर्जांच्या छाननीला गती
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी, दि. ३० : महाराष्ट्र शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती नव्याने गठीत करण्यात आली असून, समितीचे अध्यक्ष ॲड. रणवीर भैय्या राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार, दि. २९ जुलै रोजी तहसील कार्यालय, बार्शी येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत प्रलंबित असलेल्या अर्जांची छाननी करून पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. तहसीलदार तथा संजय गांधी निराधार योजना समितीचे सचिव एफ. आर. शेख यांनी या बैठकीचे आयोजन केले.
यावेळी बोलताना ॲड. रणवीर भैय्या राऊत यांनी तालुक्यातील निराधार माता-भगिनी, ज्येष्ठ नागरिक आणि गरजू व्यक्तींना शासनाच्या योजनांचा सुलभ, पारदर्शक व वेळेत लाभ मिळवून देण्यासाठी समितीतील सर्व सदस्यांनी आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन केले. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत संजय गांधी निराधार योजनेचा लाभ पोहोचविणे आणि योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता राखणे ही समितीची प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत प्रलंबित अर्जांची स्थिती, लाभार्थ्यांच्या अडचणी तसेच योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी समितीचे सदस्य हनुमंत आप्पा जाधव, संतोष कांबळे, नागनाथ आडसुळ, महेश गोरे, संतोष पाटील, सौ. अर्चनाताई विजय चव्हाण, राहुल जाधवर, शांतिकुमार दादा चोबे, अविनाश वाघमोडे, गटविकास अधिकारी पंचायत समिती तसेच विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.





