प्रा. डॉ. राहुल पालके यांच्या ‘गणपती बाप्पा तू घराघरात आहे’ कवितेतून समता व माणुसकीचा संदेश
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथील इंग्रजी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक, संशोधक, लेखक व कवी प्रा. डॉ. राहुल भगवान पालके यांनी लिहिलेल्या ‘गणपती बाप्पा तू घराघरात आहे…’ या कवितेतून भक्तीबरोबरच सामाजिक एकता, समता, परिवर्तन आणि माणुसकीचा प्रभावी संदेश देण्यात आला आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या या कवितेत कवीने मातीचा सुगंध, वाऱ्याची मंद झुळूक, वृक्ष-वेलींचा संवाद तसेच पशुपक्ष्यांचा सहवास यामध्ये गणरायाचे अस्तित्व अनुभवले आहे. त्यामुळे गणपतीचे अस्तित्व केवळ मंदिर किंवा मूर्तीपुरते मर्यादित नसून ते निसर्गाच्या कणाकणात आणि माणसाच्या मनामनात असल्याची भावना व्यक्त होते.
कवितेत समता, स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मतेचा विचार ठळकपणे मांडण्यात आला आहे. “एकतेचे दर्शन म्हणजे तो भारत देश माझा आहे” या भावनेतून विविधतेत एकता असलेल्या भारताचे सुंदर चित्र उभे राहते. तसेच भक्तीबरोबरच समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची गरज कवी अधोरेखित करतात.
कवितेच्या शेवटी “माणुसकीचा धर्म खरा आहे” हा विचार विशेष प्रभावी ठरतो. जात, धर्म आणि भेदाभेद यापलीकडे जाऊन माणुसकीला सर्वोच्च स्थान देण्याचा संदेश या कवितेतून मिळतो. साधी, सहज आणि भावस्पर्शी भाषा, निसर्गप्रतिमा व सामाजिक आशय यामुळे कविता वाचकांच्या मनाला स्पर्श करते.
भक्तीच्या माध्यमातून सामाजिक जाणीव जागृत करणारी आणि गणेशोत्सवाला मानवतावादी विचारांची जोड देणारी प्रा. डॉ. राहुल पालके यांची ही कविता निश्चितच प्रेरणादायी ठरते.




