मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर उड्डाणपूल प्रकल्पासाठी जागा हस्तांतरण; निविदा प्रक्रियेला मिळाली गती
खाजगी व राज्य शासनाच्या जागेचे नॅशनल हायवेकडे हस्तांतरण पूर्ण; प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाचा मार्ग मोकळा
B1न्यूज मराठी नेटवर्क
पंढरपूर/सोलापूर : सोलापूर शहरातील प्रस्तावित उड्डाणपूल प्रकल्पाला महत्त्वाचा वेग मिळाला असून, प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या खाजगी व राज्य शासनाच्या जागेचे नॅशनल हायवेकडे हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूर्ण करण्यात आले. पंढरपूर येथे झालेल्या कार्यक्रमात या प्रक्रियेचा औपचारिक समारंभ पार पडला.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी एन. कार्तिकेयन यांनी जागा हस्तांतरणाची प्रक्रिया वेळेत पूर्ण केली. कार्यक्रमात त्यांनी संबंधित कागदपत्रे मुख्यमंत्री यांच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतर मुख्यमंत्री यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे तसेच नॅशनल हायवेचे अधिकारी स्वप्निल कासार व संतोष देशमुख यांच्याकडे हस्तांतरणाची कागदपत्रे दिली.
उड्डाणपूल प्रकल्पाची निविदा प्रक्रिया ३ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी २५ जुलैपूर्वी जागा हस्तांतरण पूर्ण करणे आवश्यक होते. जिल्हाधिकारी कार्यालयाने ही प्रक्रिया सुमारे ९३ टक्के पूर्ण करून अंतिम टप्प्यात आणली होती. मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत आज ती औपचारिकरीत्या पूर्ण झाल्याने प्रकल्पातील महत्त्वाचा प्रशासकीय अडथळा दूर झाला.
या निर्णयामुळे ३ ऑगस्ट रोजी नव्याने निविदा काढण्याची आवश्यकता राहणार नसून, सध्या सुरू असलेली निविदा प्रक्रिया अखंडितपणे पुढे सुरू राहणार आहे. त्यामुळे उड्डाणपूलाच्या प्रत्यक्ष बांधकामाला लवकरच सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, सभागृह नेते नरेंद्र काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
उड्डाणपूल प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सोलापूर शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून, नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सुलभ होईल. तसेच इंधन बचत, वायू प्रदूषणात घट, अपघातांचे प्रमाण कमी होणे आणि शहराच्या आर्थिक व पायाभूत विकासाला चालना मिळणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.





