रस्त्यात गेलेल्या जमिनीला पूर्वीप्रमाणेच पाचपट मोबदला द्या.. शंकर गायकवाड

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : सोमवार २४ जानेवारी रोजी बार्शी ते उस्मानाबाद, तुळजापूर रस्त्यावरील शेलगाव (मा) तालुका बार्शी येथे शेतकरी संघटनांच्या वतीने सकाळी अकरा वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यावेळी बोलताना शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड म्हणाले की, लोकांनी भाजपला वैतागून सध्याचे सरकार निवडून दिले परंतु या सरकारने तर शेतकऱ्यांना मिळणारा मावेजा कमी करून शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवली आहे. राज्य सरकारने शहाणे बनून तात्काळ पूर्वीप्रमाणे पाचपट मोबदला देऊन शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करून मगच रस्त्यांची कामे करावी अन्यथा शेतकरी संघटनेच्यावतीने लवकरच मंत्रालयात घुसून तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असाही इशारा यावेळी गायकवाड यांनी दिला.
बार्शी उस्मानाबाद रस्त्याचे सुरू असलेले निकृष्ट दर्जाचे काम तात्काळ थांबवून ठेकेदारास ब्लॅक लिस्ट करा, गावांमध्ये सर्विस रस्ते व गटारीचे बांधकाम करा, २६ नोव्हेंबर २०२१ रोजी राज्य सरकारने जमीन अधिग्रहणाच्या मोबदल्याबाबत काढलेला आदेश तात्काळ रद्द करावा. आदी मागण्यांचे निवेदन बार्शी तहसीलचे प्रतिनिधी मंडळाधिकारी शरद शिंदे व बांधकाम विभागाचे प्रतिनिधी सचिन वास्कर यांना देण्यात आले. त्यावेळी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड, स्वाभिमानीचे युवा तालुकाध्यक्ष शरद भालेकर, गणेश शिंदे, रामेश्वर शिंदे, जयकुमार बारंगुळे, तानाजी यादव, रामराव काटे, रामहरी पेजगुडे आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. यावेळी तालुका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रवीण जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी या आंदोलनाचा चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.