“प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ सफाई कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचविणे हे प्रशासनाचे कर्तव्य” – अध्यक्ष शेरसिंग डागोर
सफाई कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण हाच सार्वजनिक स्वच्छतेचा पाया!
B1न्यूज मराठी नेटवर्क
नंदुरबार, दिनांक 30 ऑक्टोंबर, 2025 : नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता यांचा पाया म्हणजे सफाई कर्मचारी. शहर, गाव, रुग्णालये, शाळा, कार्यालये या सगळीकडे स्वच्छतेची जबाबदारी निःस्वार्थपणे पेलणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे योगदान अमूल्य आहे. “समाज आरोग्यदायी आणि सुरक्षित राहावा यासाठी हे स्वच्छतेचे योद्धे दिवसरात्र कार्यरत असतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्य, निवासस्थान, शिक्षण आणि जीवनमानाचा प्रश्न प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्याने हाताळावा,” असे आवाहन महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगा चे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी नंदुरबार येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या व अडचणी निवारणासाठी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे, नगरपालिका प्रशासन सहाय्यक आयुक्त जमीर लगेरकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भानुदास रोकडे, नगरपालिका मुख्याधिकारी राहुल वाघ (नंदुरबार), साजिद पिंजारी (शहादा), विक्रम जगदाळे (तळोदा), मयुर पाटील (नवापूर), नगरपंचायत धडगांवचे मुख्यकार्यकारी अधिकारी हर्षल सोनवणे, तसेच जिल्ह्यातील नगर परिषदांचे अधिकारी उपस्थित होते.
डागोर यांनी बैठकीच्या प्रारंभी सफाई कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमांचे कौतुक करताना सांगितले की “कोरोना काळात, पूरस्थितीत किंवा कोणत्याही सार्वजनिक सण-उत्सवात हे कर्मचारी समाजासाठी अग्रभागी उभे राहिले. या कर्मचाऱ्यांनी दाखवलेला निष्ठेचा आदर्श समाजासाठी प्रेरणादायी आहे.” त्यांनी पुढे नमूद केले की सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य हेच त्यांच्या कार्यक्षमतेचे मूळ आहे. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणी शिबिरे, आरोग्य विमा योजना, तसेच आयुष्यमान भारत कार्ड वितरण 100 टक्के पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम हाती घ्यावी.
डागोर यांनी विशेषत्वाने घरकुल या विषयावर लक्ष केंद्रित करत सर्व नगरपरिषदांना घरकुल योजनेंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांना प्राधान्याने घरे उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. जागेअभावी प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करून पर्यायी व्यवस्था करण्यास सांगितले. त्यांनी म्हाडाच्या घरकुल योजनेअंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांना घरे मिळावीत म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश दिले. शिक्षण व समाजकल्याण विभागांना सूचित करत त्यांनी सांगितले की, सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती, पुस्तके, वसतिगृह सुविधा व प्रशिक्षण कार्यक्रमांचा लाभ मिळायला हवा. मृत सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्क कायम ठेवून त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरीत समाविष्ट करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. समाजकल्याण विभागाने सफाई कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या विविध योजना जसे की स्वयंरोजगार, कर्जयोजना, अपघात विमा, शिक्षण साहाय्य इ. वस्त्यांमध्ये विशेष जनजागृती शिबिरे घेऊन प्रचारित कराव्यात, असेही त्यांनी नमूद केले.
याशिवाय सफाई कर्मचाऱ्यांना आर्थिक सक्षमता मिळावी यासाठी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, अंत्योदय योजना अशा विविध योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करावेत. सण-उत्सव काळात सफाई कर्मचाऱ्यांना चक्रीय सुटी प्रणाली लागू करून कामाचा ताण कमी करण्याचेही त्यांनी सुचविले.
बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी सांगितले की, “सफाई कर्मचाऱ्यांना जातवैधता प्रमाणपत्र, किमान वेतन, घरकुल योजना आणि आरोग्य विमा यांचा लाभ सहज मिळावा यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः वचनबद्ध आहे. या घटकांचे जीवनमान सुधारल्याशिवाय खरी ‘संपूर्ण स्वच्छता’ शक्य नाही.”
बैठकीचा समारोप प्रेरणादायी वातावरणात झाला. शेरसिंग डागोर यांनी शेवटी सांगितले, “स्वच्छतेचे काम हे केवळ कर्तव्य नाही, ती एक सेवा आहे. या सेवेला सन्मान आणि प्रतिष्ठा देणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान म्हणजे समाजातील प्रत्येक घराचा सन्मान.”




