परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 245 कोटींच्या मदत निधीला मंजूरी
B1न्यूज मराठी नेटवर्क
परभणी : सप्टेंबर-2025 या कालावधीत छत्रपती संभाजीनगर विभागातील बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड आणि पुणे विभागातील सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेतपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरीता महसूल व वन विभागाचा शासन निर्णय, दि. 16 ऑक्टोबर 2025 अन्वये 1 हजार 356 कोटी 30 लक्ष 22 हजार इतका निधी वितरीत करण्यास शासनाने मंजूरी दिली आहे. सदर निधीपैकी परभणी जिल्ह्यातील 4 लाख 39 हजार 297 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 245 कोटी 64 लक्ष 49 हजार इतका निधी मंजूर झाला आहे.
‘सप्टेंबर-2025 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्यासाठी सातत्याने पाठपूरावा करण्यात आला. दरम्यान, शासनाने नुकसानीची तात्काळ दखल घेवून परभणी जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी तब्बल 245 कोटी रुपयांच्या निधीची तातडीने मदत जाहीर केल्याबद्दल पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
शासन निर्णयानुसार सप्टेंबर-2025 या कालावधीत अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांची संख्या, बाधित क्षेत्र (हेक्टर), आणि मंजूर निधी यांचा तपशील पुढील प्रमाणे आहे. सप्टेंबर-2025 – बाधित शेतकरी संख्या -4,39,297 बाधित क्षेत्र (हेक्टर)-2,85,853.78 हेक्टर, मंजूर निधी- रु. 245 कोटी 64 लाख 49 हजार. मंजूर झालेला निधी डीबीटी पोर्टलव्दारे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर वितरीत करण्यात येणार आहे.




