जलजीवन मिशन योजनेची प्रलंबित कामे तातडीने पुर्ण करा – जिल्हाधिकारी विकास मीना

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचा आढावा ,कामे थांबविणाऱ्या कंत्रादारांची देयके थांबवा
B1न्यूज मराठी नेटवर्क
यवतमाळ, दि. 28 : जिल्ह्यात जलजीवन मिशनची अनेक कामे प्रलंबित आहे. ही कामे तातडीने पुर्ण करा. कामांसाठी निधी नाही, अशी कारणे सांगता येणार नाही. या कारणांसाठी कामे थांबविणाऱ्या कंत्राटदारांची देयके थांबवा. चांगले काम करणाऱ्या कंत्राटदारांची देयके आधी द्या, असे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिले.
महसूल भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश नाटकर, जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश काळबांडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता प्रफुल्ल व्यवहारे, वीज वितरणचे कार्यकारी अभियंता श्री.खंगार, जिल्हा आरोग्य अधिकारी मेघराज पुराम यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कंत्राटदारांची आर्थिक क्षमता पाहुनच त्यांना जलजीवनची कामे देण्यात आली आहे. त्यामुळे निधी नाही या सबबीखाली कंत्राटदारांना कामे थांबविता येणार नाही. त्यांनी सलग काम करणे आवश्यक आहे. ज्या कंत्राटदारांनी या सबबीखाली कामे थांबविली आहे, त्यांची देयके, आगावू देयके शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर अदा करू नका. ज्यांनी निधीची अडचण न सांगता कामे केली त्यांचीच देयके अदा करा. देयके अदा करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना निश्चित करा आणि त्याप्रमाणेच देयके द्या, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
जिल्ह्यात प्रलंबित कामांना गती मिळणे आवश्यक आहे. पुढील बैठकीत उपविभागनिहाय प्रगतीचा आढावा घेण्यात येतील. उपअभियंत्यांना यावेळी प्रगती दाखवावी लागेल. कामे करतांना आधी पाण्याची टाकी व विहीरींची कामे करा. या योजनांमधून नागरिकांना लवकरात लवकर पाणी उपलब्ध होईल, यासाठी विभागाने प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.
जलजीवन मिशन योजनेंतर्गत जिल्ह्यात 1 हजार 539 कामे मंजूर आहे. त्यापैकी 263 कामे पुर्ण झाली आहे. योजनेतून हर घर नल से जल ही संकल्पना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात 5 लाख 22 हजार 884 कुटुंब असून त्यापैकी 4 लाख 20 हजार कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आली आहे. 1 लाख 2 हजार कुटुंबांना जोडणी देणे बाकी असल्याचे बैठकीत कार्यकारी अभियंता निलेश काळबांडे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सर्व पाणी पुरवठा स्त्रोतांचे मान्सूनपुर्व नमुने घेऊन तपासणी केली जाते. नमुन्यांच्या अहवालानुसार पाणी गुणवत्ता सुधारणेच्या उपाययोजना केल्या जातात. जिल्ह्यात नळ योजनांचे 3 हजार 552 स्त्रोत आहे. या सर्व स्त्रोतांचे नमुने घेण्यात आले आहे. या स्त्रोतांचे भूजल सर्वेक्षण विभागाने तातडीने विश्लेषण करावे. ज्या ठिकाणी तपासणीचे काम कमी आहे, तेथे संबंधितांना अतिरिक्त उद्दिष्ट देऊन तपासणी करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.