सोयाबीन पिकाचे पंचनामे करण्याची मागणी

B1न्युज मराठी नेटवर्क
बार्शी तालुक्यात सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. जून, जुलै महिन्यामध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे सोयाबीन पिकाची शेतकऱ्याने मोठ्या प्रमाणात पेरणी केली होती. पीक भरात येण्याच्या मार्गावर असतानाच ऑगस्ट महिन्यात २० ते २२ दिवस पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले होते.
सोयाबीन पीक कसे-बसे येण्याच्या मार्गावर असतानाच परतीच्या पावसाने झोडपल्याने शेतकऱ्यांच्या हाती-तोंडाला आलेला घास पावसाने हिरावल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, या दुःखातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची गरज आहे.
तहसीलदार साहेबांनी तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांना परतीच्या पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे, त्या शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी राहुल भड, अशोक माळी, दशरथ उकरडे, नागेश काजळे, सतीश भड या शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.