बार्शी शहर व तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून आमदार राजेंद्र राऊत यांची मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना विनंती

B1न्युज मराठी नेटवर्क
बार्शी : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर व तालुक्यामध्ये ४ सप्टेंबर २०२१ ते ७ सप्टेंबर २०२१ या कालावधीमध्ये सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात पाऊस झाला. या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरून शेतातील शेती उपकरणे, अवजारे पाण्यात वाहून गेली आहेत. त्याचबरोबर फळबागांची व सोयाबीन, तूर, उडीद, मूग इत्यादी पिकांची तसेच कांदा, टोमॅटो, मिरची इत्यादी भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच अनेकांच्या घरांची पडझडही झालेली आहे.
बार्शी शहरातील प्रत्येक प्रभागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरून जीवनावश्यक वस्तूंचे व संसार उपयोगी वस्तूंचे अतोनात नुकसान होऊन, अनेक घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. त्याचप्रमाणे शहरातील अनेक दुकानांमध्ये पाऊसाचे पाणी जाऊन दुकानातील सामानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
तरी बार्शी शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून, त्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी विनंती आमदार राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब, विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब, मदत व पुनर्वसन मंत्री मा. विजय वडेट्टीवार साहेब, पालकमंत्री मा. दत्तात्रय मामा भरणे साहेब, जिल्हाधिकारी मा. मिलिंद शंभरकर साहेब यांना ई-मेल द्वारे पत्र पाठवून व तहसीलदार मा. सुनील शेरखाने साहेब यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.