पत्रकारिता टिकली पाहिजे ती जबाबदारी समाजाची – ह.भ.प.ॲड. जयवंत बाेधले महाराज

व्हाईस ऑफ मीडिया संघटनेच्या कार्यालयाचे उदघाटन
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी :पत्रकारांच्या भविष्याचा विचार घेवून तळमळीने काम करणारी व्हाॅईस ऑफ मीडिया ही संस्था उभी राहीली व आज ती देश आणि जगभर काम करत आहे. समाजातील विचारवंत हा टिकला व जगला पाहिजे, त्याला सांभाळण्याची जबाबदारी ही समाजाची असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. ॲड. जयवंत बाेधले महाराज यांनी केले. व्हाॅईस ऑफ मीडिया संघटनेच्या राज्याच्या कार्यालयाचे उदघाटन बार्शीत दि.१६ करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आ.राजेंद्र राऊत, मा.आ ॲड.दिलीप सोपल, मा. नगराध्यक्ष विश्वास बारबोले, संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष संदिप काळे, योगेंद्र दोरकर, उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ, बाळासाहेब पानसरे,भिमेश मुतुला चेतन कात्रे, विजय चोरडिया, अरुण ठोंबरे, अमर चोंदे उपस्थित होते.
बाेधले म्हणाले, पत्रकारांच्या कल्याणासाठी पंचसुत्रीच्या माध्यमातून व्हाॅईस ऑफ मीडिया संस्थेचे कार्य सध्या सुरु आहे. पत्रकार बऱ्याचदा अपूर्व काय आहे हे शोधत असतात. कोणत्याही कार्यक्रमातील अचूक शोधण्याची बुध्दी भगवंताने पत्रकारांना दिली आहे. समाजातील ‘स ‘ हे अक्षर संस्कार, सात्विकता, संस्कृती समन्वयाचे असल्याने ही पत्रकारिता टिकणे अत्यंत गरजेचे आहे. ती गरज व आवश्यकता ओळखून व्हाॅईस ऑफ मीडिया संघटनेने बार्शीसारख्या अत्यंत अध्यात्मिक आणि ऐतिहासिक द्रष्टीकोनातून महत्वपूर्ण स्थान असलेल्या नगरीमध्ये आज राज्याचं कार्यालय होतंय हा बार्शीकरांच्या दृष्टीने अत्यंत मोठा अभिमान आहे.पत्रकारांच्या हातातील लेखनी आणि साधुसंतांची वाणी एकत्र झाली तर समाजामध्ये नक्की बदल होईल.
आ राऊत म्हणाले, पत्रकारांच्या समस्या व त्यांचे संरक्षण होण्यासाठी अशा संघटनेची गरज होती. राजकिय व्यक्ती असो वा पत्रकार त्यांना उपजिवीकेसाठी इतर जोडव्यवसाय आवश्यक असतात. पत्रकारांसाठी आपली भूमिका ही नेहमीच सहानुभुतीची राहिल असे सांगितले.
सोपल म्हणाले, पत्रकारांच्या संघटनेचे व्हाईस ऑफ मीडिया हे नाव सर्वसामान्यांचा आवाज दर्शविणारे, सुरु असलेल्या कार्याला खूप साजेसे असून, यातील विश्वस्त हे लोकांना आश्वस्त करणारे आहेत. अनेक पत्रकार हे नुसत्या पत्रकारितेवर अवलंबून आहेत, अनेक पत्र ही त्याचा व्यवसाय म्हणून अवलंबून आहेत याचा मेळ घालायचे काम या संघटनेचे आहे. काही चॅनल्स पूर्वी कसे बोलत होते आता कसे बोलतात हे आपल्या लक्षात येते. पण सध्या जो सोशल मीडिया कार्यरत आहे त्याची समाजाला गरज आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष संदिप काळे म्हणाले, या व्हाईस ऑफ मिडीयाच्या माध्यमातून पत्रकारांचे घर, आरोग्य, त्यांच्या मुलांचे शिक्षण, नवीन तंत्रज्ञान आणि निवृत्तीनंतरचे कार्य ही पंचसूत्री हाती घेतली व त्यानुसार आमचा प्रवास सुरु आहे. देशभरातील ८५ टक्के पत्रकारांची आजची अवस्था अशी आहे की त्यांच्यासमोर उद्या काय करायचे हा मोठा प्रश्न आहे. अशा मूलभूत गजरांची पूर्तता करण्यासाठी विविध विंग्जच्या माध्यमातून कार्य सुरु असल्याचे सांगीतले. यासाठी ग्रामीण महाराष्ट्राला जोडण्यासाठी , संपर्कासाठी याची गरज ओळखून बार्शी येथे कार्यालय सुरू करण्यात आले असल्याचे सांगितले.
उपाध्यक्ष कुंकूलोळ यांनी प्रास्ताविकात पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी केलेल्या उपाययोजना आणि भविष्यातील आराखडा मांडला. मुद्रण, इलेक्ट्रॉनिक्स, डिजीटल अशा वेगवेगळ्या विभागात कार्य करणाऱ्या पत्रकारांचे संरक्षण, आरोग्य, शिक्षण, निवारा अशा मूलभूत गजरांची पूर्तता करण्यासाठी विविध विंग्जच्या माध्यमातून कार्य सुरु असल्याचे सांगीतले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस कार्यालयाच्या इमारतीची फित कापून, नामफलकाचे उदघाटन व दीपप्रज्वलन करण्यात आले. अपर्णा दळवी यांनी सूत्रसंचलन केले, गणेश भोळे यांनी आभार मानले.