पोलादपूर-महाबळेश्वर आंबेनळी घाट मार्ग १६ ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी बंद
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांचा आदेश; सार्वजनिक सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य
B1न्यूज मराठी नेटवर्क
रायगड, दि. ११ : भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला असून आंबेनळी घाट परिसरातील भौगोलिक परिस्थिती आणि संभाव्य नैसर्गिक आपत्ती लक्षात घेता पोलादपूर-महाबळेश्वर (आंबेनळी घाट) राज्य महामार्ग क्र. १३९ हा दि. १६ ऑगस्ट २०२६ पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी जारी केले आहेत.
पोलादपूर-महाबळेश्वर (आंबेनळी घाट) मार्ग सुरक्षिततेच्या दृष्टीने यापूर्वीही दि. ७ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यानंतर मार्गावरील परिस्थितीचा आढावा घेत सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक बंद ठेवण्याची मुदत वाढविण्याची विनंती तहसीलदार, पोलादपूर यांनी केली होती.
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ, मुंबई यांच्याकडून या मार्गावर आवश्यक संरक्षणात्मक कामे, दरड हटविणे, पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या यंत्रणेची देखभाल, संरक्षक भिंतींची दुरुस्ती तसेच इतर आवश्यक सुरक्षा उपाययोजना सातत्याने करण्यात येत आहेत. मात्र, घाट परिसरातील नैसर्गिक आपत्तीजन्य घटना मानवी नियंत्रणाबाहेर असल्याने संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सार्वजनिक जीवित व मालमत्तेच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
आंबेनळी घाटातील भौगोलिक परिस्थिती, दरडी कोसळण्याची संभाव्यता तसेच अतिवृष्टीमुळे निर्माण होणारा धोका लक्षात घेता कोणत्याही क्षणी गंभीर अपघात अथवा जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोलादपूर-आंबेनळी घाट-महाबळेश्वर राज्य महामार्ग क्र. १३९ वरील सर्व प्रकारची वाहतूक दि. १६ ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे.
नागरिकांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून बंद असलेल्या आंबेनळी घाट मार्गावरून प्रवास करू नये तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.





