बार्शी उपसा सिंचन योजनेला उजनीच्या उजव्या कालव्यातून पाणी; आमदार राजाभाऊ राऊत यांच्या हस्ते जलपूजन
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी, दि. २३ जुलै : मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार राजाभाऊ राऊत यांनी शासनस्तरावर सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, बार्शी तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या बार्शी उपसा सिंचन योजनेसाठी उजनी धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे.
यापूर्वी आमदार राजाभाऊ राऊत यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमवेत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन बार्शी उपसा सिंचन योजनेसाठी पाणी उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा केली होती. त्यानुसार जलसंपदा विभागाने या योजनेसाठी पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.
या पाण्यामुळे बार्शी शहरातील राऊत तलाव आणि गणेश तलाव पूर्ण क्षमतेने भरले जाणार असून, शहरातील विहिरी, कूपनलिका आणि बोअरवेल्सच्या पाणीपातळीतही लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याला मोठा दिलासा मिळणार असून नागरिकांना याचा थेट लाभ होणार आहे.
यावेळी धसपिंपळगाव रोड, बार्शी बायपास येथील बार्शी उपसा सिंचन कालव्याच्या आउटलेटवर पाणी पोहोचल्यानंतर आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते जलपूजन करण्यात आले. या प्रसंगी नगराध्यक्षा तेजस्विनीताई कथले, उपनगराध्यक्ष रोहित पाटील, दीपक रोंगे, पाणीपुरवठा सभापती भैय्या बारंगुळे, दादासाहेब गायकवाड, पृथ्वीराज राजपूत, प्रकाश माने, अमोल सुरवसे, मल्लिनाथ गाढवे, नगरसेवक-नगरसेविका, बार्शी उपसा सिंचन योजनेचे अधिकारी, अभियंते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. बार्शी शहराच्या दीर्घकालीन पाणीप्रश्नाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, यामुळे शहराच्या जलसाठ्यात वाढ होऊन भविष्यातील पाणीटंचाईवर मोठ्या प्रमाणात मात करण्यास मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.





