टेंभुर्णी–येडशी महामार्गाच्या चौपदरीकरणाला मोठी गती; आमदार राजेंद्र राऊत यांच्या पाठपुराव्याला यश
कोकण भवनातील बैठकीनंतर प्रस्ताव केंद्र सरकारकडे; लवकरच प्रशासकीय मान्यतेची शक्यता
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी तालुक्यासह सोलापूर, धाराशीव आणि लातूर जिल्ह्यांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या टेंभुर्णी–येडशी राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण (4-Lane) प्रकल्पाला मोठी गती मिळाली आहे. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या सातत्यपूर्ण पाठ पुराव्यामुळे या प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून, लवकरच प्रशासकीय मान्यता मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबई येथील कोकण भवन येथे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे सचिव संतोष शेलार यांच्या उपस्थितीत आमदार राजेंद्र राऊत यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत टेंभुर्णी–येडशी महामार्गाच्या चौपदरीकरणाचा सविस्तर प्रस्ताव केंद्र सरकारकडे तातडीने पाठविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. बैठकीनंतर संबंधित प्रस्ताव मंजुरीसाठी दिल्लीकडे रवाना करण्यात आला.
टेंभुर्णी–येडशी हा मार्ग सोलापूर आणि मराठवाड्याला जोडणारा प्रमुख दळणवळणाचा मार्ग आहे. गेल्या काही वर्षांत या मार्गावरील वाहतुकीत मोठी वाढ झाल्याने चौपदरीकरणाची मागणी सातत्याने होत होती. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, अपघातांचे प्रमाण घटेल, तसेच सोलापूर, धाराशीव आणि लातूर जिल्ह्यांतील व्यापारी, औद्योगिक आणि कृषी क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. याशिवाय प्रवाशांचा वेळ व इंधनाचीही मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.
याबाबत आमदार राजेंद्र राऊत म्हणाले, “टेंभुर्णी–येडशी महामार्गाचे चौपदरीकरण हा संपूर्ण मतदारसंघाच्या विकासाचा महत्त्वाचा टप्पा आहे. या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला असून, आज झालेल्या सकारात्मक बैठकीमुळे प्रकल्पाला लवकरच केंद्र सरकारची प्रशासकीय मान्यता मिळेल आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असा विश्वास आहे.”
या घडामोडीनंतर बार्शी तालुक्यासह संपूर्ण परिसरातील नागरिक, व्यापारी, शेतकरी आणि वाहनधारकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, लवकरच या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





