श्री काशी जगद्गुरू विश्वाराध्य वीरशैव विद्यापीठातर्फे वीरशैव सिद्धान्त परीक्षांचे आयोजन
परीक्षेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – रावसाहेब मनगिरे
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : श्री काशी जगद्गुरू विश्वाराध्य वीरशैव विद्यापीठ, जंगमवाडी मठ, वाराणसी यांच्या वतीने श्री काशीजगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी आणि श्री काशी जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या मंगलमय आशीर्वादाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वीरशैव सिद्धान्त परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. वीरशैव धर्म, तत्वज्ञान, पंचपीठे परंपरा आणि कार्य तसेच जगद्गुरू, शरण व संत माहात्म्यांनी केलेल्या महान कार्याची माहिती आबालवृद्धांपर्यंत पोहोचावी, या उदात्त हेतूने या परीक्षा घेण्यात येतात.
या विद्यापीठाद्वारे वीरशैव सिद्धान्त प्रबोध, वीरशैव सिद्धान्त प्रवीण आणि वीरशैव सिद्धान्त पंडित अशा तीन स्तरांवरील परीक्षांचे आयोजन केले जाते. या परीक्षांमध्ये गुणानुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रीकाशी जगद्गुरूंच्या अमृत हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात येते.
या परीक्षामध्ये वीरशैव सिद्धान्त प्रबोध परीक्षा व वीरशैव सिद्धान्त प्रवीण परीक्षा असून, प्रबोध व प्रवीण या दोन्ही परीक्षा १०० गुणांच्या असून एकाच दिवशी घेतल्या जातात. प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका एकत्रच असते. या परीक्षांमध्ये किमान ३५ गुण मिळवून उत्तीर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाते आणि त्यानंतरच पंडित परीक्षा देता येते.
वीरशैव सिद्धान्त पंडित परीक्षेत प्रथम वर्ष वीरशैव तत्वदर्शन, द्वितीय वर्ष वीरशैव अष्टावरण विज्ञान आणि तृतीय वर्ष श्री सिद्धान्तशिखामणी समीक्षापंडित परीक्षेच्या तिन्ही वर्षांच्या परीक्षांमध्ये किमान ३५ गुण मिळवून उत्तीर्ण झाल्यानंतर श्रीकाशी जगद्गुरु विश्वाराध्य वीरशैव विद्यापीठ, जंगमवाडी मठ, वाराणसी यांच्याकडून पंडित प्रमाणपत्र प्रदान केले जाते. या परीक्षेसाठी फॉर्म भरण्याची अंतिम मुदत दि. १० मे २०२६ असून, परीक्षा दि. २८ जून २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत होणार आहे.
परीक्षा नाव नोंदणीसाठी संतोष खुडे (मो. ९७६३३४५७०३), प्रविण महाराज (मो. ८३०८६९४८२४), योगेश घंटे मो.(९८०४५४१००८) व परीक्षेच्या संदर्भात अधिक माहितीसाठी डॉ. अनंत बिडवे (परीक्षा समिती सदस्य, महाराष्ट्र राज्य, मो. ९४०३१५१००८) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजक श्री वीरशैव विद्या संवर्धिनी मंडळ, बार्शी यांच्या वतीने करण्यात आले आहे. वीरशैव धर्म, तत्त्वज्ञान व परंपरेचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी इच्छुक शिष्य व भाविकांनी या परीक्षेसाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक श्री वीरशैव विद्या संवर्धिनी मंडळाचे रावसाहेब मनगिरे यांच्या कडून करण्यात आले आहे.





