युवक विकसित भारताचे स्वप्न घडवू शकतात : डॉ. राहुल पालके
श्री शिवाजी महाविद्यालयात भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना विनम्र अभिवादन
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : भारत हा युवकांचा देश आहे. विकसित भारताचे स्वप्न युवक घडवू शकतात, असा आशावाद शहीद दिनानिमित्त मांडण्यात आला. येथील श्री शिवाजी महाविद्यालयात युवकांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यानात डॉ. राहुल पालके हे बोलत होते. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. ए. बी. शेख व सार्वजनिक उत्सव समितीचे चेअरमन डॉ. एस. बी. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
डॉ. राहुल पालके यांनी आपल्या व्याख्यानपर मार्गदर्शनात भगतसिंग, सुखदेव थापर आणि शिवराम राजगुरू या क्रांतिकारकांच्या देशभक्तीच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची भूमिका स्पष्ट केली. केंद्रीय कायदेमंडळातील बॉम्बस्फोट प्रकरण, सेफ्टी बिल, ट्रेड डेस्पूट बिल आणि लाहोर षडयंत्र या ऐतिहासिक घटनांची माहिती दिली. या त्रयींचे कार्य आजच्या युवकांसाठी आदर्श कसे आहे आणि त्याची समकालीन उपयुक्तता काय आहे यावरही त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. ए. बी. शेख यांनी त्याग, संघर्ष आणि राष्ट्रभक्ती याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी शहदींच्या कार्याचे स्मरण करून समकालीन सामाजिक व राष्ट्रीय घडामोडींचा संदर्भ देत युवकांना जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहन केले.कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी शहीदांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांच्या आदर्शांचा अंगीकार करण्याचा संकल्प व्यक्त केला.





