अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचरांचा राज्य शासनाविरोधात विराट मोर्चा नागपूर हिवाळी अधिवेशनावर धडकणार
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंशकालीन अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचर कृती समितीच्या वतीने 10 डिसेंबर २०२५ वार बुधवार रोजी राज्य शासनाविरोधात नागपूर विधानसभा हिवाळी अधिवेशनावर विराट मोर्चा निघणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे व सचिव कॉम्रेड डॉ. प्रवीण मस्तुद यांनी दिली आहे. या मोर्चाचे रूपांतर बेमुदत धरणे आंदोलनात होऊन प्रश्न सुटेपर्यंत ते चालेल. या मोर्चाला जिल्ह्यातील सर्व अर्धवेळ स्त्री परिचर मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असेही प्रसिद्ध पत्रकार म्हणले आहे.
अधिक माहिती अशी की अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचय यांना राज्य सरकारचे मासिक 2900 तर केंद्र सरकारकडून शंभर रुपये असे एकत्रित तीन हजार रुपये वेतन आहे. आरोग्य खात्याचे आयुक्त व संचालक यांनी पगारवाढीची शिफारस करून देखील त्यांची पगार वाढ गेली 5 वर्षे झालेली नाही. इतक्या अल्प वेतनामध्ये त्यांचे जगणे शक्य नसल्याने त्यांचे वेतन 21 हजार रुपये करावे ही मुख्य मागणी घेऊन या मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचरांना जिल्हा परिषदांच्या त्यांच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे वर्ग ३ व ४ च्या पदावर सामावून घ्यावे, त्यांना केवळ स्त्री परिचर असे संबोधून पूर्णवेळ करण्यात यावे.
शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वार्षिक अर्जित रजा, किरकोळ रजा, वैद्यकीय रजा व राष्ट्रीय सणाच्या सुट्टया देण्यात याव्या, सेवानिवृत्तीनंतर त्यांना सामाजिक सुरक्षिततेचे सर्व लाभ देण्यात यावे तसेच ग्रॅच्यूईटी व पेन्शन लागू करण्यात यावी, प्रसुती रजा व भाऊबीज भेट अंगणवाडी कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळावी, दरवर्षी दोन गणवेश, सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षे पुर्ववत ठेवण्यात यावे, बायोमेट्रीक हजेरीची सक्ती बंद करण्यात यावी, त्यासोबतच सरकार कामगार कायद्यांची मोडतोड करून चार श्रम संहिता लागू करत आहे त्यामुळे कष्टकरी वर्गाचे जीवन उध्वस्त होणार आहे व भांडवलदार पैसेवाल्या वर्गाला शोषण करण्याची मुभा मिळणार आहे ह्या चार श्रमसंहिता मागे घ्याव्या ही मागणी देखील या मोर्चामध्ये करण्यात येणार आहे.




