कर्तव्यदक्ष तहसीलदार एफ. आर. शेख यांच्या कार्यतत्परतेमुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : सप्टेंबर महिन्यात बार्शी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक गावांतील शेती, पिके तसेच घरांचे मोठे नुकसान झाले होते. पुराच्या पाण्याने शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले, आर्थिक संकट ओढवले आणि अनेक ठिकाणी जगण्यासाठी संघर्षमय परिस्थिती निर्माण झाली होती.
या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बार्शी तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार एफ. आर. शेख यांनी तत्परता आणि संवेदनशीलतेचा आदर्श ठेवला. अतिवृष्टीग्रस्त भागांचा तात्काळ दौरा करून त्यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणांना आदेश देत त्वरित पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. दिवसरात्र न थकता तालुका प्रशासन, महसूल विभाग आणि संबंधित अधिकारी यांनी संयुक्तरीत्या काम करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा अहवाल तयार केला.
शेख यांनी हा अहवाल शासनदरबारी सादर करून सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे शासनाने नुकसानभरपाईचे मंजुरी आदेश दिले. परिणामी दिवाळीच्या मुहूर्तावर बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाईची रक्कम जमा होत आहे. या निर्णयामुळे शेतकरी वर्गात मोठा दिलासा आणि समाधानाची भावना पसरली आहे. अनेक शेतकऱ्यांनी तहसीलदार एफ. आर. शेख, महसूल अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
स्थानिक शेतकरी संघटनांनी सांगितले की, “एफ. आर. शेख यांच्या कार्यतत्परतेमुळे प्रशासनाचे खरे रूप दिसले. वेळेवर पंचनामे, अचूक अहवाल आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळेच आज आम्हाला दिवाळीपूर्वी हा दिलासा मिळाला.” कर्तव्यनिष्ठा, पारदर्शकता आणि लोकसेवेचा उत्कृष्ट आदर्श प्रस्थापित करणारे तहसीलदार एफ. आर. शेख हे आज शेतकऱ्यांच्या आशेचे आणि विश्वासाचे प्रतीक ठरत आहेत.




