पूरग्रस्त कुटुंबांना पुरवठा विभागामार्फत मोफत धान्य व जनावरांसाठी चारा वाटप
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांची तत्परता
B1न्यूज मराठी नेटवर्क
आज रोजी पर्यंत 7 तालुक्यातील 4710 कुटुंबांना 249 क्विंटल गहू तर 250 क्विंटल तांदूळ वाटप, आज रोजी पर्यंत 6 तालुक्यांना 205 टन चाऱ्याचे वितरण
सोलापूर, दिनांक 30 : सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना शासनाच्या वतीने मोफत अन्नधान्य व जनावरांसाठी चारा वाटप करण्यात येत असून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे अत्यंत तत्परतेने मोफत धान्य वाटपाची कार्यवाही करत आहेत.
जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी सर्व तहसीलदारांना तातडीने पूरग्रस्त कुटुंबांना गतीने धान्य वितरण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. यामध्ये प्रत्येक कुटुंबाला दहा किलो गहू व दहा किलो तांदूळ उपलब्ध केले जात आहे. तसेच शासनाच्या नुकत्याच घेतलेल्या निर्णयाप्रमाणे लवकरच प्रती कुटुंब तीन किलो तूर डाळ वाटप केले जाणार आहे, परंतु सद्यस्थितीत गहू व तांदूळ वाटप सुरू आहे.
आज रोजी पर्यंत माढा, करमाळा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ, अक्कलकोट व सांगोला या सात तालुक्यातील 4710 कुटुंबांना 249 क्विंटल गहू तर 250.80 क्विंटल तांदूळ वाटप करण्यात आलेले आहे. त्याप्रमाणे जसे तहसीलदार यांच्याकडून बाधित कुटुंबाची माहिती मिळत आहे, त्याप्रमाणे पुरवठा विभागाकडून मोफत धान्य वाटप तात्काळ केले जात असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. सरडे यांनी दिली.
दि. 29 सप्टेंबरपर्यंत तालुकानिहाय धान्य वाटपाचा तपशील :
माढा तालुका – 254 कुटुंबांना – गहू – 23.6 व तांदूळ – 25.4 क्विंटल
करमाळा तालुका – 229 कुटुंबांना गहू 22.90 व तांदूळ – 22.90 क्विंटल
उत्तर सोलापूर – 698 कुटुंबांना गहू 70 व तांदूळ – 90 क्विंटल
दक्षिण सोलापूर – 2326 कुटुंबांना गहू 12.20 व तांदूळ – 12.20 क्विंटल
मोहोळ तालुका – 1140 कुटुंबांना गहू 114 व तांदूळ – 114 क्विंटल
अक्कलकोट तालुका – 3 कुटुंबांना गहू 6 व तांदूळ – 6 क्विंटल
सांगोला तालुका – 60 कुटुंबांना गहू 0.30 व तांदूळ – 0.30 क्विंटल
बार्शी तालुका – माहिती संकलन प्रक्रियेत.
दि. 30 सप्टेंबरपर्यंत तालुकानिहाय जनावरांसाठी चारा वाटपाचा तपशील:-
माढा तालुका – 90.075 टन, – मोहोळ तालुका – 64.837 टन, करमाळा तालुका – 10 टन, दक्षिण सोलापूर – 12 टन, उत्तर सोलापूर – 20 टन, अक्कलकोट तालुका – 9 टन असे एकूण 205.912 टन चारा वितरीत करण्यात आला आहे. तर 216 पॉईंट 33 क्विंटल चारा शिल्लक असून मागणीप्रमाणे चारा पाठवला जात असल्याचे श्री. सरडे यनी सांगितले.
जिल्हा प्रशासन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कटिबद्ध असून अन्नधान्य व जनावरांसाठी चारा वितरणासोबतच इतर आवश्यक मदत ही पूरग्रस्तापर्यंत अत्यंत काळजीपूर्वक पोहोचवली जात आहे. एक ही नागरिक मोफत अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही या दृष्टीने नियोजन करण्यात आलेले आहे.




