पालघर जिल्हा रुग्णालय येथील रक्तपेढीचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उद्घाटन
रक्तदान हेच पवित्र दान – पालकमंत्री गणेश नाईक
B1न्यूज मराठी नेटवर्क
पालघर,दि.21: रक्तदान हे पवित्र दान आहे. रक्त पुरवठा शरीराला वेळेत झाला नाही तर मानवाला आपला जीव गमवावा लागतो. जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढी मार्फत रुग्णांना रक्तदान करण्यात येते तसेच रक्तदान करण्यासाठी शिबिर आयोजित करून रुग्णांना नवजीवन देण्याचे उत्तम कार्य जिल्हा रुग्णालय मार्फत करण्यात आले असल्याचे प्रतिपादन वनमंत्री तथा पालघर जिल्हयाचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी आज पालघर येथे केले.
पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पालघर जिल्हा रुग्णालय येथील रोटरी क्लब ऑफ मुंबई यांच्यावतीने उभारण्यात आलेल्या रक्तपेढीचे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आ.राजेंद्र गावित, जि.प.पालघरचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम, जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रामदास मराड, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ.बाळकृष्ण इनामदार व रोटरी क्लबचे सदस्य, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री गणेश नाईक म्हणाले की, कर्तव्यदक्षतेने कोणत्याही प्रकारचा मोठेपणा तसेच गाजावाजा न करता रोटरी क्लब ऑफ मुंबईचे सदस्य काम करतात याचा मला आनंद आहे. भविष्यामध्ये रोटरी क्लबचे सहकार्य अशाचप्रकारे पालघर जिल्हयातील नागरिकांना मिळत राहील असा विश्वास पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला.
ही रक्तपेढी पालघर जिल्हयातील रुग्णांसाठी नवसंजीवनीचे काम करेल रोटरी क्लब ऑफ मुंबई यांच्यामार्फत रक्तपेढीतून आजपर्यंत 252 रुग्णांना रक्त पुरवठा करण्यात आला आहे. तसेच पालघर रुग्णालय रक्तपेढी अंतर्गत एकूण 5 रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते असे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.
पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते वृक्षारोपण
वनमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते सुरंगी आणि बकुळी या रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी आ.राजेंद्र गावित, आ.ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखड आदि मान्यवर उपस्थित होते.




