कृषिदिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकऱ्यांना केले सन्मानित ,धोरणात्मक कृषि योजनांवर मार्गदर्शन
B1न्यूज मराठी नेटवर्क
धाराशिव : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हा परिषद धाराशिवतर्फे स्थायी समिती सभागृहात “कृषिदिन” साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार होते.प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने,जिल्हा परिषदेचे श्मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन इगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शाम गोडभरले व इतर मान्यवर होते.
जिल्ह्यात शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १६ शेतकऱ्यांना व काही अधिकाऱ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.यामध्ये राहुल वीर (आळणी), दत्ता रणदिवे (मेडसिंगा), हर्षवर्धन गुंड (काटी), हनुमंत गवळी (वडगाव काटी), सचिन बिराजदार (भुसणी) व इतरांचा समावेश होता.
जिल्हाधिकारी पुजार यांनी “२०२५ -२०२९ ” या कालावधीसाठीच्या कृषी, फलोत्पादन, पशुसंवर्धन, रेशीम, फळप्रक्रिया, अपारंपरिक ऊर्जा व पर्यटन या क्षेत्रातील धोरणात्मक कृती योजनांवर मार्गदर्शन केले.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी वाढती लोकसंख्या आणि घटते शेती क्षेत्र यामध्ये तंत्रज्ञानाच्या वापरातून आर्थिक प्रगती कशी साधावी,यावर विचार मांडले.
कार्यक्रमाला कृषि विज्ञान केंद्र तुळजापूरचे प्रा. एस. एल. सुर्यवंशी,”शिवार सारथी” संस्थेचे संचालक विकास गोडसे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.प्रस्तावना रविंद्र माने यांनी केली. संचालन कृषी अधिकारी लेणेकर यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन कृषि विभाग,जिल्हा परिषद धाराशिव व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाने केले.
शेवटी उपविभागीय कृषि अधिकारी एम.के.आसलकर यांनी वसंतराव नाईक यांच्या कार्यावर भाष्य केले व नागेश पाटील यांनी आभारप्रदर्शन करत कार्यक्रमाची सांगता केली.




