शेतकऱ्यांनी खात्याचे नुतनीकरण करुन पिककर्जाचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी विकास मीना

यावर्षी 2 हजार 200 कोटी पिककर्ज वाटपाचे उद्दिष्ट, आतापर्यंत 84 हजार शेतकऱ्यांना 874 कोटीचे वाटप
B1न्यूज मराठी नेटवर्क
यवतमाळ : शेतकऱ्यांकडे मागील कर्जाची थकबाकी असल्याने त्यांना नवीन कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे थकीत असलेल्या शेतकऱ्यांनी जुन्या कर्जाचा भरणा करून आपले खाते नुतनीकरण करून घ्यावे आणि खरीप हंगामात नवीन पिककर्जाचा लाभ घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पिककर्ज वाटपाचा आढावा घेतला.
जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँका, महाराष्ट्र ग्रामीण बँक तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला या खरीप हंगामासाठी एकुण 2 हजार 200 कोटींचे खरीप पिक कर्जवाटपाचे लक्षांक देण्यात आले आहे. सर्व बँकांमार्फत जिल्ह्यातील पात्र शेतकरी सभासदांना पिक कर्ज वितरण करण्यात येत आहे. दि. 13 जूनपर्यंत सर्व बँकांमार्फत 84 हजार 668 पात्र शेतकऱ्यांना 874 कोटी 53 लाख रुपयांचे खरीप पिक कर्ज वितरण करण्यात आले आहे. तसेच खरीप पिक कर्ज मागणी करणाऱ्या सर्व पात्र शेतकरी सभासदांना बँकांमार्फत खरीप पिक कर्ज वितरण सुरु आहे.
ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील मागील थकीत पिककर्जाचा भरणा अद्यापपर्यंत बँकेकडे केलेला नाही, तसेच या कर्जाचे नुतनीकरण केलेले नाही, अशा सर्व शेतकरी सभासदांनी कर्जमाफीची वाट न पाहता त्यांच्याकडील थकीत पिक कर्जाचे नुतनीकरण करुन किंवा विविध बँकांकडील एकमुस्त कर्ज परतफेड योजनेचा लाभ घेऊन संबधित बँक शाखेकडून या खरीप हंगामाकरीता पिक कर्ज उपलब्ध करुन घ्यावे. थकीत कर्जामुळे बँकांच्या एनपीएमध्ये वाढ होत असुन एनपीएमध्ये गेलेल्या कर्ज खात्याला रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार बँकांमार्फत कर्ज वितरण करणे शक्य होत नाही, अशा परीस्थितीत कर्ज वसुली होणे अतिशय महत्वाचे आहे.
जिल्ह्यातील सर्व शेतकरी सभासदांनी संबंधित बँक शाखेकडे जाऊन त्यांचेकडील थकीत पिक कर्जाचे नुतनीकरण करुन घ्यावे तसेच बँकांच्या विविध सवलत योजनांचा लाभ घेऊन या खरीप हंगामामध्ये खरीप पिक कर्ज वितरण उपलब्ध करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी कळविले आहे.