नीती आयोगाच्या बक्षीसातून ७५ शेतकऱ्यांना सिंचनासाठी शेततळ्यांचे वाटप , एक कोटी ७५ लाखांचे अनुदान

B1न्यूज मराठी नेटवर्क
धाराशिव : नीती आयोगाच्या ‘आकांक्षीत जिल्हा उपक्रमांतर्गत सन २०२१ मध्ये धाराशिव जिल्ह्याला प्राप्त झालेल्या बक्षीस निधीचा उपयोग करत जिल्ह्यातील ७५ शेतकऱ्यांना सिंचनासाठी शेततळ्यांचे वाटप करण्यात आले आहे.या उपक्रमासाठी एकूण एक कोटी ७५ लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले असून, त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जलसंधारण व पाण्याचा शाश्वत वापर करण्यास मोठी मदत होणार आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांची निवड करून त्यांना हे शेततळे देण्यात आले असून, त्यामध्ये धाराशिव तालुक्याचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे १४ शेतकऱ्यांना ३२.०२ लाख रुपये इतके आहे. त्यानंतर तुळजापूर तालुक्याला १२ शेतकऱ्यांना २८.६४ लाख, कळंबला ११ शेतकऱ्यांना २६.८९ लाख, उमरग्याला ५ शेतकऱ्यांना २४.६८ लाख,परंड्याला ७ शेतकऱ्यांना २१.३१ लाख,भूमला ९ शेतकऱ्यांना १७.५८ लाख,वाशीला १२ शेतकऱ्यांना १२.४६ लाख व लोहाऱ्याला ५ शेतकऱ्यांना ११.४१ लाख रुपयांचे शेततळे वाटप करण्यात आले आहे.
या शेततळ्यांमुळे पावसाळ्याच्या पाण्याचा साठा करून शेतकऱ्यांना वर्षभर सिंचनाची सुविधा मिळणार आहे. विशेषतः उन्हाळ्यातील पाण्याची टंचाई व पिकांची हानी या समस्यांना यामुळे आळा बसेल. शासनाच्या ‘हर घर जल’, ‘वॉटर फॉर ऑल’ आणि ‘जलयुक्त शिवार’ यांसारख्या अभियानांना हातभार लावणारी ही योजना असून, शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीतही याचा सकारात्मक परिणाम होईल,असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकल्पासाठी जिल्हा प्रशासनाने पारदर्शक पद्धतीने शेतकऱ्यांची निवड केली असून,भूजल सर्वेक्षण आणि उपलब्ध क्षेत्राच्या आधारे ही शेततळ्यांची रचना करण्यात आली आहे.यामुळे पाण्याचा अपव्यय टाळून शाश्वत शेतीस चालना मिळणार आहे.
जिल्हाधिकारी,कृषी विभाग व जलसंधारण विभागाच्या समन्वयातून या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून,भविष्यात याच धर्तीवर अधिक शेतकऱ्यांना लाभ देण्याचा मानस आहे.नीती आयोगाच्या माध्यमातून मिळालेल्या निधीचा हा वापर जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी एक सकारात्मक पाऊल ठरतोय.
शेतकरी बांधवांनी याचा अधिकाधिक लाभ घ्यावा आणि पाण्याचा जपून व प्रभावी वापर करून समृद्ध शेतीकडे वाटचाल करावी,असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.