जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विकसित कृषी संकल्प अभियानाचे उद्घाटन

B1न्यूज मराठी नेटवर्क
यवतमाळ : केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयांतर्गत भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्यावतीने जिल्ह्यात दि.२९ मे ते १२ जून या कालावधीत विकसित कृषी संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या जनजागृती रथाचा शुभारंभ करुन जिल्हाधिकारी विकास मीना यांच्याहस्ते अभियानाचे उद्घाटन करण्यात आले.
कृषी तंत्रज्ञानाची जनजागृती गावोगावी करण्यासाठी विकसित कृषी संकल्प अभियान डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत कृषी विज्ञान केंद्र तसेच कृषी विभाग, आत्मा, अक्शन फॉर फूड प्रोडक्शन- अफ्रो व ईफ्को यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे.
अभियान जिल्ह्यातील १६ तालुक्यातील १७५ ते २०० गावांमध्ये राबविण्यात येणार आहे. अभियानादरम्यान चर्चा सत्राद्वारे शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अभियानांतर्गत जिल्ह्यासाठी विशेष चार फिरते कृषी रथ तयार केली करण्यात आले आहे.
या रथांद्वारे गावोगावी यात्रा काढण्यात येणार आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांपर्यंत नवीन कृषी तंत्रज्ञान पोहोचविणे, त्याचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देणे तसेच शासनाच्या विविध योजनांबद्दल माहिती देवून शेतकरी बांधवांचे उत्पन्न वाढविणे हा यात्रेचा उद्देश आहे.
सदर संकल्प यात्रेतून शेतकरी, कृषी अधिकारी आणि शास्त्रज्ञ यांच्यात थेट संवाद साधला जाणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन व कृषी विज्ञान केंद्रामार्फत करण्यात आले आहे. यावेळी कृषी उपसंचालक चव्हाण, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख मयुर ढोले तसेच कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.