आंबा- मिलेट महोत्सव २०२५ चे उद्घाटन , शेतकऱ्यांना उत्तम बाजार सुविधा द्या- राज्यपाल हरिभाऊ बागडे

B1न्यूज मराठी नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर, दि.२३ – सहकारी संस्था या सगळ्यांच्या हिताचा विचार करणाऱ्या असाव्या. त्यासाठी आपापसातले मतभेद बाजूला ठेवावे. आंबा महोत्सवासारखे आयोजन करुन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्तम बाजार सुविधा संचालकांनी उपलब्ध करुन द्याव्या, असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी आज येथे केले.
एकदा चांगल्या कामाला सुरुवात केली त्याला लोकांचा विश्वास प्राप्त होतो. बाजार समिती मार्फत राबविल्या जाणाऱ्या शेतकरी हिताच्या सर्व उपक्रमात आपला सहयोग असेल, असे आश्वासन पालकमंत्री संजय शिरसाट यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले.
येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आंबा मिलेट महोत्सव २०२५ चे उद्घाटन आज राज्यपाल हरिभाऊ बागडे, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते आज करण्यात आले. आ. अनुराधा चव्हाण यांचीही यावेळी उपस्थिती होती. बाजार समितीच्या वतीने उभारण्यात आलेल्या पेट्रोल पंपाचे लोकार्पणही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
बाजार समितीच्या आवारात आयोजित या महोत्सवात आंबा उत्पादक शेतकरी, धान्य उत्पादक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला बचत आदींनी आपले स्टॉल्स लावले होते. बाजार समितीचे सभापती डॉ. राधाकिसन पठाडे, संचालक रामुकाका शेळके, भगावन मुळे, मुरलीधर चौधरी, व्यवस्थापक नितीन पाटील, विभागीय सह. निबंधक शरद दरे, एच पी कंपनीचे अजय सिन्हा आदी उपस्थित होते. हा महोत्सव पाच दिवस सुरु राहणार आहे.
पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, बाजार समितीचे कार्य चांगले असून शेतकऱ्यांसाठी ते महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देणे. शेतमालाची विक्री सुविधा उपलब्ध करणे यातून शेतकऱ्यांचे हित साधण्याच्या या कामात आपले नेहमीच सहकार्य आणि सहयोग राहिल,असे त्यांनी उपस्थितांना आश्वस्त केले. आ. अनुराधा चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. राधाकिसन पठाडे यांनी केले.