जगाला युद्धाची नाही भगवान बुद्धांची गरज , विश्वशांतीचा; मानवतेचा बुद्धविचार माणसामाणसापर्यंत पोहोचवा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बँकॉक येथील सर्वात मोठ्या बुद्ध विहारात रामदास आठवलेंनी बुद्ध पौर्णिमा साजरी केली
B1न्यूज मराठी नेटवर्क
संपूर्ण विश्वात बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी
बँकॉक / मुंबई दि.12 : शांतीशिवाय विकास नाही; न्याय नाही; जीवनात आनंद नाही. भगवान बुद्धांनी दिलेला विश्वशांतीचा मानवतेचा बुद्धविचार माणसापर्यंत पोहोचवला पाहिजे.जगाला युद्धाची नाही तर भगवान बुद्धांच्या विचारांची गरज आहे असे सांगत ना. रामदास आठवले यांनी जगभरातील बौद्धांना बुद्ध जयंती च्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज बँकॉक मधील सर्वात मोठ्या वॅट फो या ऐतिहासिक बुद्धविहारात बुद्ध पौर्णिमे निमित्त बुद्धवंदना बुद्धपूजा करून बुद्ध जयंती साजरी केली.
थायलँड मध्ये बुद्धपूजा प्रार्थना वंदना संपूर्णपणे पाली भाषेत आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध धम्माची दिक्षा देऊन मोठी क्रांती केली आहे.इतिहास घडविला आहे. धर्मांतर करून बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याचा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा निर्णय क्रांतिकारक ठरला आहे. सम्राट अशोकानंतर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात केलेले धम्मचक्रप्रवर्तन ही जगातील सर्वात मोठी धम्मक्रांती ठरली आहे असे ना.रामदास आठवले म्हणाले.
भारतात स्थापन झालेला बौद्ध धम्म जगभरातील 80 देशांत पोहोचला आहे.जगात बौद्धांची लोकसंख्या तिसऱ्या क्रमांकाची आहे. बुद्ध विचार हा माणसाला माणूस बनविणारा माणसाच्या मनातील अहंकार दूर करणारा विचार आहे.भगवान बुद्धांशिवाय जगाला पर्याय नाही असे सांगत ना.रामदास आठवले यांनी संपूर्ण जगभरातील बौद्धांना बुद्ध जयंती च्या शुभेच्छा दिल्या आहेत.
बँकॉक मधील वॅट फो या बुद्धविहारात ना.रामदास आठवले यांनी बुद्ध जयंती साजरी केली त्या बुद्धविहाराला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भेट दिली होती. तिथे आज ना. रामदास आठवले यांनी सपत्नीक भेट देऊन बुद्धपूजा केली.यावेळी ना. रामदास आठवले यांच्या पत्नी सौ. सीमाताई आठवले, राज वासनिक; चंद्रशेखर कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.