आगामी सण, उत्सव कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करावे – महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे

B1न्यूज मराठी नेटवर्क
रायगड दि.27 : श्रीराम नवमी, हनुमान जयंती, महावीर जयंती, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि गुढी पाडवा व रमजान ईद हे सण, उत्सव कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करण्यासाठी सर्वांनी जिल्हा प्रशासनासह पोलिस यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले. तसेच या कालावधीत जिल्हा पोलिसांची सोशल मीडियवर करडी नजर असून कुणीही सामाजिक एकता व सलोखा तसेच शांतता भंग करणारा मजकूर प्रसारीत करू नये, असे आवाहनही कु.तटकरे यांनी केले.
रायगड जिल्हा प्रशासनाच्या मार्फत गुढीपाडवा, रमजान ईद, श्रीराम नवमी, हनुमान जयंती, महावीर जयंती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नियोजन भवन सभागृहात शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्यासह शांतता समिती सदस्य, सर्व उपविभागीय अधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित होते.
आगामी सण व उत्सवाचा काळ लक्षात घेता जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत. सण-उत्सव साजरे करताना न्यायालयांच्या तसेच प्रशासनाच्या आदेशांचे पालन होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. उत्सवाला कोणतेही गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. सण उत्सव आणि सलग आलेल्या सुट्ट्या पाहता पर्यटक मोठया प्रमाणावर येण्याची शक्यता आहॆ. हे लक्षात घेता जिल्ह्यातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी बायपास मार्ग काढणे तसेच पर्यायी रस्ते कसे विकसीत करता येईल, याबाबत नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.तसेच या कालावधीत रुग्णवाहीका तैनात ठेवाव्यात.
याबरोबरच फायर ब्रिगेडच्या गाड्या देखील सुसज्ज ठेवाव्या. अनेकदा मिरवणूक मार्गांवर अंधार असतो त्या ठिकाणी हॅलोजन ची व्यवस्था करावी. तसेच याकाळात वीज पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी असे निर्देश कु.तटकरे यांनी दिले.