ग्रंथ हे ज्ञानाचे प्रेरणा स्त्रोत : जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते ‘जालना ग्रंथोत्सव 2024’ चे उद्घाटन
B1न्यूज मराठी नेटवर्क
जालना : चांगल्या शरीरासाठी नियमित व्यायाम तर चांगल्या मनासाठी वाचन आवश्यक आहे. नियमित वाचनामुळे वैचारिक कक्षाही रुंदावतात. ग्रंथ हे ज्ञानाचे प्रेरणा स्त्रोत असल्याने वाचन संस्कृती अधिक वाढण्यासाठी प्रशासनाकडून जिल्ह्यातील शाळांना ग्रंथ उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जालना ग्रंथोत्सव 2024” चे आयोजन जालना येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, टाऊन हॉल येथे करण्यात आले आहे. या भव्य ग्रंथोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी ग्रंथोत्सवाचे अध्यक्ष कवी डॉ. ललित अधाने, सहायक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे, कवयित्री डॉ. संजिवनी तडेगावकर, जालना जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष राजेश राऊत, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले की, ग्रंथ हे मानवी जीवनातील खरे गुरु आहेत. विविध ग्रंथाद्वारे मानवाच्या ज्ञानात भर पडत असते. ग्रंथामुळे मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे माणसाला प्रेरणा व प्रोत्साहन मिळते. कुणालाही पुस्तके वाचल्याशिवाय त्यांचे महत्व कळत नाही. जसे आपणांस चांगले शरिर पाहिजे असेल तर नियमित व्यायामाची आवश्यकता असते, तसेच चांगले विचार येण्यासाठी ज्ञान वाढविण्यासाठी नियमित वाचन आवश्यक आहे. वाचानाची सवय ही अंगवळणी पडणे आवश्यक आहे.
आजच्या मोबाईलच्या युगात वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी शासनामार्फत ग्रंथोत्सवचे आयोजन करुन वाचन संस्कृती वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ग्रंथ हे ज्ञानाचे प्रेरणा स्त्रोत असल्याने जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत जिल्ह्यातील शाळांना विविध प्रकारचे ग्रंथ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यापूढे ही शाळांना ग्रंथ उपलब्ध करुन देण्यात येतील. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात ही ग्रंथालय सुरु करण्याचा मानस असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यावेळी म्हणाले. तसेच जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी यावेळी वाचनाविषयी स्वतःचे अनुभव कथन करत वाचनाने विचारसरणीत फरक पडतो. जीवनात काही चांगल्या गोष्टी सांगून आत्मसात होत नसतात, तर वाचनाची सवय निर्माण करावी लागते असे सांगितले.
ग्रंथोत्सवाचे अध्यक्ष कवी डॉ. ललित अधाने म्हणाले की, ग्रंथ हे अभिव्यक्तीचे मोठे साधान आहे. जीवनमूल्ये अधोरेखित करण्याचे काम साहित्य करते. ग्रंथ हे समाजाला दिशा देण्याचे काम करतात. स्वतःला अद्यायावत ठेवणे, आजच्या स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी वाचनाला पर्याय नाही. आज मोबाईलवर सर्व काही उपलब्ध असले तरी जीवनात पुस्तक वाचनाला खुप महत्व आहे. कारण वाचनामुळे मानवाच्या विचारात प्रगल्भता येते. पुस्तकाशिवाय पर्याय नसल्याचे आपल्या महामानवांनी सांगितले आहे.
नवे विचार मांडून समाजाला दिशा देण्याचे काम ग्रंथ करत आहे. मराठी भाषा अडीच हजार वर्षापूर्वीची असल्याने आधीपासूनच ती अभिजात भाषा आहे. यामुळेच परिवर्तन चळवळ, प्रबोधन चळवळ, वारकरी संप्रदाय चळवळ ही आपल्या महाराष्ट्रातून झाली आहे. ओवी, अभंग, पोवाडा, गवळण, भारूड, छक्कड, लावणी आदी प्रकारी हे केवळ आपल्या मराठी भाषेतच आहे. त्यामुळे मराठी भाषा ही सुरुवातीपासूनच समृध्द भाषा आहे. ग्रंथ हे आपल्याला घडविण्याचे काम करतात.
ग्रंथोत्सव हे एक असे व्यासपीठ आहे की, जेथे विचारांची देवाण घेवाण होते. याकरीता विद्यार्थी आणि नागरिकांनी या ग्रंथोत्सवात सहभागी व्हावे.
यावेळी सहायक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे म्हणाले की, ग्रंथाशी संबंध असणारे साहित्यीक, लेखक, कवी, प्रकाशक, विक्रेते यांनी एकत्र येवून वाचन संस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न करावा यासाठी अशा प्रकारच्या ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. ग्रंथालय चळवळ ही माणसाला जगण्याची कला शिकवते.
व्यक्तीमत्व विकासासाठी वाचन खुप महत्वाचे आहे. या कार्यक्रमासाठी आपल्या पालकांना सुध्दा घेवून या. आपल्या आवडणाऱ्या लेखाचे एकतरी पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्याने वाचायला पाहिजे. ही पुस्तक आपण व पालकांनी तसेच शिक्षकांनी खरेदी करावी. वाचनाची आवड वाढली पाहिजे, यासाठी शासनाने आता वाचन प्रकल्प हाती घेतला आहे.
कवयित्री डॉ. तडेगावर म्हणाल्या की, मराठवाड्यात जाती-धर्म, गट-तटात भांडण अशा परिस्थितीत संत आणि महापुरुषांनी जातीच्या पलीकडे जाऊन प्रेम, स्नेहभाव निर्माण केला होता. त्यांनी दाखवलेली वैश्विक भावना ,साहित्यिकांना संवेदनशीलता, कारुण्य साहित्यात प्रकट करावी लागेल वाचनामुळे मानवाला आत्मिक समाधान मिळते. तसेच जगण्याचा दृष्टीकोन ही वाचनामुळेच बदलण्यास मदत होते. आपल्या शहरात ग्रंथोत्सवाचा मोठा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून आपल्याला ज्ञानाचे भांडार उपलब्ध होणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे यांनी केले. तर आशिष रसाळ यांनी आभार मानले. प्रारंभी वाचन संस्कृती वाढविण्याकरीता गांधी चमन ते टाऊन हॉल या दरम्यान ग्रंथ दिंडीचे आयोजन करुन जनजागृती करण्यात आली. ग्रंथ दिंडी मध्ये मनपाचे मुख्य लेखाधिकारी तुकाराम भिसे, मुख्य लेखा परिक्षक प्रविण निंबाळकर, कवी डॉ. ललित अधाने, सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे तसेच लोकमान्य प्राथमिक विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते.
तसेच ग्रंथोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे देखील उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सार्वजनीक ग्रंथालयाचे पदाधिकारी आणि नागरीकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. रंगनाथ खेडेकर यांनी केले.