महिला बचत गटांसाठी गुणवत्तापूर्ण उत्पादन हाच आर्थिक सक्षमीकरणाचा मार्ग – विलास जाधव

0

नवतेजस्विनी महोत्सवाचे उद्घाटन

B1न्यूज मराठी नेटवर्क

धाराशिव : महिला बचत गटांनी गुणवत्तापूर्ण व दर्जेदार उत्पादने तयार केल्यास त्यांना स्थायी बाजारपेठ मिळू शकते आणि आर्थिक सक्षमीकरण शक्य आहे,असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव यांनी केले.

आज १७ मार्च रोजी नवतेजस्विनी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. हा महोत्सव शहर पोलीस ठाण्यासमोरील सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या वेळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक शोभा कुलकर्णी,धाराशिव तालुका कृषी अधिकारी एस.पी.जाधव, प्रभारी महिला व बाल कल्याण अधिकारी किशोर गोरे, आयसीआयसीआय बँकेचे विभागीय अधिकारी योगेश पाटील आणि एफ. झेड. हुसेनी यांची प्रमुख उपस्थिती होती.

जाधव यांनी सांगितले की,महिला बचत गटांचा उद्देश महिलांनी एकत्रित उत्पादन करून आर्थिक स्थैर्य मिळवणे हा आहे.मात्र,सध्या काही महिला स्वतंत्रपणे उत्पादन करून नफा घेतात. यामुळे सर्व महिलांना समान संधी मिळत नाही. संघटित उत्पादन व विक्री केल्यास सर्व महिलांचा आर्थिक विकास शक्य आहे.

तालुका कृषी अधिकारी जाधव यांनी कृषी विभागाच्या १४० योजनांपैकी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेसाठी १० लाख रुपयांपर्यंत अनुदान आणि बचत गटाच्या नोंदणीकृत कंपनीसाठी १ कोटी रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते,असे सांगितले.मात्र, यासाठी महिलांचा बँक सिबिल स्कोअर चांगला असणे आवश्यक आहे.

आयसीआयसीआय बँकेचे अधिकारी योगेश पाटील म्हणाले की,महिला बचत गटांसाठी कर्जपुरवठ्याची सुरुवात १३ वर्षांपूर्वी झाली. धाराशिव जिल्ह्यात कर्जफेडीचे प्रमाण केवळ ०.०५ टक्के असल्याने महिलांना यापुढेही व्यावसायिक कर्ज मिळवण्यासाठी मदत केली जाईल.

गोरे यांनी सांगितले की, ग्रामपंचायतींनी उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावेत आणि उत्पादित वस्तू देशभर विक्रीसाठी पोहोचवाव्यात.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक श्रीमती कुलकर्णी यांनी सांगितले की, महामंडळाच्या ५० वर्षांच्या कारकिर्दीत १३५ गावांमध्ये बचत गटांची स्थापना करण्यात आली आहे. विविध उद्योग सुरू असून मदर पोल्ट्री, डाळ मिल आणि शेळीपालन यासारख्या प्रकल्पांमध्ये महिला सहभागी होत आहेत.

या महोत्सवात ५० स्टॉल उभारण्यात आले होते,जिथे महिलांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थ व विविध वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. सावित्री माता सीएमआरसीच्या सहयोगिनी शोभा धावारे,सखू सोनकांबळे,निर्मला शिंदे,सुवर्णा बनसोडे तसेच व्यवस्थापक श्रद्धा एडके व किशोर टोम्पे यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल ट्रॉफी,सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. “इतनी शक्ति हमें देना दाता…” या समूहगीताने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. सूत्रसंचालन स्वप्नाली अत्रे यांनी केले, आभार किशोर टोम्पे यांनी मानले.जिल्हाभरातील महिला बचत गटांच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या