२२ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालत , लोक अदालतीत प्रलंबित खटले तडजोडीने मिटवावेत – प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांचे आवाहन

B1न्यूज मराठी नेटवर्क
धाराशिव : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,दिल्ली आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.२२ मार्च रोजी शनिवारी सकाळी १० वाजता जिल्हा न्यायालय,उस्मानाबाद आणि सर्व तालुका न्यायालयांमध्ये ही लोकअदालत भरविण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील न्यायालयीन प्रलंबित तसेच वादपूर्व प्रकरणांमध्ये तडजोडीच्या माध्यमातून जलद न्यायनिर्णय व्हावा,या उद्देशाने लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये दिवाणी प्रकरणे,तडजोडपात्र फौजदारी खटले, मोटार अपघात प्रकरणे,कौटुंबिक वाद, धनादेशाशी संबंधित प्रकरणे तसेच जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग येथील तडजोडीस पात्र प्रकरणांचा सामावेश असेल.
लोकअदालतीत समेटाद्वारे प्रकरणे निकाली काढण्यात येतात.न्यायालयीन लढ्याचा खर्च,वेळ व त्रास टाळण्यासाठी पक्षकारांनी लोकअदालतीत आपल्या प्रकरणांचा निपटारा करून न्यायाचा जलद लाभ घ्यावा,संबंधित पक्षकारांनी आपल्या वकिलांशी संपर्क साधून राष्ट्रीय लोकअदालतीत सामोपचाराने तडजोड करण्यासाठी पुढे यावे आणि या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष एस.सी.खटी आणि वरिष्ठ न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव वसंत यादव यांनी केले आहे.