माझी वसुंधरा अभियानामध्ये अधिक प्रभावी कार्यवाहीचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश

B1न्यूज मराठी नेटवर्क
नवी मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानामध्ये ‘क’ वर्ग महापालिकांत सर्वोत्तम पर्यावरणशील शहराचा बहुमान नवी मुंबई महानगरपालिकेने पटकाविला असून यावर्षीच्या अभियानामध्ये अधिक उत्तम कामगिरीसाठी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही करण्यात येत आहे. या अंतर्गत झालेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेताना आयुक्तांनी कामांना गती द्यावी आणि ठरविलेल्या उद्दिष्टांनुसार 30 मार्चपर्यंत कार्यवाही पूर्ण करावी असे निर्देश दिले.
उद्यान विभागामार्फत ठिकठिकाणी वृक्षारोपण केले जात असून त्यामध्ये देशी वृक्षरोपांच्या लागवडीवर भर देण्यात येत आहे. जेणेकरून या माध्यमातून नवी मुंबई शहरातील जैवविविधता वाढीस लागावी. सदर वृक्षारोपण कार्यवाहीचे लक्ष्य विहित कालावधीत पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने नियोजन करावे असे आयुक्तांनी निर्देश दिले. त्यामध्ये बांबूच्या लागवडीवर विशेष भर देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्याचप्रमाणे सायन पनवेल हायवेच्या दुतर्फा असलेल्या मोकळ्या जागा तसेच एमआयडीसी क्षेत्रातील वृक्षारोपणावर भर देण्याचे सूचित केले.
यामध्ये सीएसआर निधी मिळवून वृक्षराजी वाढीवर भर देण्याचे आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले. वृक्षारोपणाप्रमाणेच उद्यानांमध्ये नर्सरी विकसित करण्याकडे विशेष लक्ष द्यावे तसेच बीज संकलन केंद्रांची संख्याही वाढवावी आणि नागरिकांमध्ये त्याविषयी व्यापक जनजागृती करावी असे आयुक्तांनी सांगितले.
प्रतिबंध असलेल्या एकल वापराचे प्लास्टिक तसेच प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी जनजागृती करण्यासोबतच प्लास्टिकच्या वापर रोखण्यासाठी ठोस शोध मोहीमा हाती घ्याव्यात व कारवायांची व्याप्ती वाढवावी असेही निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
केंद्र सरकारच्या जलसंचय – जलभागीदारी मोहीमेंतर्गत सोसायट्यांना सहभागी करून घेऊन जलसंचयासाठी सोसायट्यांच्या आवारातच उपाययोजना करण्याबाबत व्यापक स्वरूपात अंमलबजावणी करावी असे आयुक्तांनी यावेळी निर्देश दिले.
माझी वसुंधरा अभियान अंतर्गत प्रत्येक विभागाने आपापल्या कामांची जबाबदारी समजून घेऊन ती विहित वेळेत पार पाडण्याविषयी नियोजन करावे व त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी आणि विभागांनी आपापसात समन्वय राखून कामांमध्ये सुनियोजितता राखावी असे निर्देश देतानाच आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी प्रत्येक विभागामार्फत करण्यात येत असलेल्या कामांचा अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्यामार्फत नियमित आढावा घेतला जाईल हे स्पष्ट केले.
स्वच्छतेप्रमाणेच पर्यावरणालाही महत्व देणा-या आपल्या नवी मुंबई शहराचे माझी वसुंधरा अभियानातील मानांकन सतत उंचावत राहील अशाप्रकारे उद्दिष्ट ठेवून कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांना दिले.