बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना २५% अग्रीम रक्कम तात्काळ वाटप करावी

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : तालुक्यात खरीप सोयाबीन पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणात केली जाते. चालू वर्षी सन २०२३ मध्ये जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस पडल्याने सोयाबीन पिकाची पेरणी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केली होती. ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये निसर्गाने शेतकऱ्यांना साथ दिली नसल्याने, तालुक्यातील ११ मंडळापैकी १० मंडळात सलग २१ दिवसाचा पावसाचा खंड पडल्याने सोयाबीन पिकाची वाढ खुंटल्याने, उत्पन्नात घट येऊ शकते.
तालुक्यातील शेतकर्यांना सोयाबीन पिकावर दोन पैसा मिळवण्याचे साधन आहे. तेच पीक वाया गेले तर, शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह थांबू शकतो.
तालुका कृषी कार्यालय बार्शी आणि तहसील कार्यालय बार्शी यांनी २१ दिवसाचा पावसाचा खंड पडल्यामुळे पिकाचे नुकसान झाले आहे, असा अहवाल जिल्हाधिकारी यांना देऊन एक महिना झाले आहे.
तरी पण पिक विमा कंपनी शेतकऱ्यांना २५% अग्रीम रक्कम देण्यास टाळाटाळ करत आहे. बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना पंधरा दिवसाचे आत २५% अग्रीम रक्कम पिक विमा कंपनीने तात्काळ वाटप करावी, अन्यथा कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते राहुल भड, विशाल कराड, किरण संकपाळ, धैर्यशील कराड आदी शेतकरीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे कळवला आहे.