बार्शी तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या – आमदार राजाभाऊ राऊत यांची कृषी मंत्र्यांकडे मागणी
B1 न्यूज मराठी नेटवर्क
मुंबई / बार्शी : मंत्रालय, मुंबई येथे आमदार राजाभाऊ राऊत यांनी राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांची भेट घेऊन बार्शी तालुक्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली. खरीप हंगाम २०२६ मध्ये पावसाने मोठा खंड पडल्याने तालुक्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे सांगत शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली.
आमदार राजाभाऊ राऊत यांनी कृषी मंत्र्यांना सांगितले की, बार्शी तालुक्यात यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, मका, कांदा, भुईमूग आणि मूग या पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली होती. जून महिन्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने खरीप पिकांची लागवड केली. मात्र त्यानंतर पावसाने दीर्घ खंड दिल्याने पिकांची वाढ थांबली असून अनेक ठिकाणी पिके करपण्याच्या स्थितीत आहेत.
तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून तातडीने पंचनामे पूर्ण करून संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देत नुकसान भरपाई मंजूर करावी, अशी मागणी आमदार राऊत यांनी कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्याकडे केली. कृषी मंत्र्यांनी बार्शी तालुक्यातील परिस्थितीची दखल घेत संबंधित विभागाकडून आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक भूमिका दर्शवल्याची माहिती आमदार राजाभाऊ राऊत यांनी दिली.




