सोयाबीन, उडीद, मूग पिकांचे तातडीने पंचनामे करा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत व नुकसानभरपाई देण्याची मागणी
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी, दि. १ सप्टेंबर २०२६ : बार्शी तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाने मोठी ओढ दिल्याने सोयाबीन, उडीद व मूग पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई व आवश्यक मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.
बार्शी तालुक्यात सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यावर्षी सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी असले, तरी जुलै महिन्यात खरीप पिकांच्या पेरणीसाठी आवश्यक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन, उडीद व मूग पिकांची पेरणी केली.
मात्र त्यानंतर मागील ३० ते ३५ दिवसांपासून पावसाचा मोठा खंड पडल्याने पिकांना आवश्यक पाणी मिळाले नाही. परिणामी पिकांची वाढ खुंटली असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. अनेक भागांत पिकांची परिस्थिती अत्यंत गंभीर असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या पार्श्वभूमीवर बार्शी तालुक्यातील सोयाबीन, उडीद व मूग पिकांच्या नुकसानीचे तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्यात यावेत. तसेच शासनाच्या नियमांनुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई व मदत मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत एफ. आर. शेख यांच्याकडे निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीची तातडीने दखल घेण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी राहुल भड, अशोक माळी, हर्षवर्धन बोधले, शिवशंकर ढवण, शरद कापसे, बालाजी सांगळे, भागवत गोरे, भारत देशमुख यांच्यासह बार्शी तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.





