कारगिल विजय दिनानिमित्त लोककल्याण भवनात वीरांचा गौरव; अहिल्यानगरच्या कारगिल वीरांचा राज्यस्तरीय सन्मान

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500

मुंबई, २७ जुलै : कारगिल विजय दिनाच्या २७ व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबई येथील लोककल्याण भवनात आयोजित राज्यस्तरीय गौरव सोहळा देशभक्ती, शौर्य आणि कृतज्ञतेने भारलेला ठरला. महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार, मंत्री आशिष शेलार, शंभूराज देसाई, महासंचालक पोलीस सदानंद दाते, तिन्ही दलांचे वरिष्ठ अधिकारी, सैनिक कल्याण विभागाचे संचालक दीपक ठोंगे तसेच कारगिल वीर, वीरपत्नी आणि सैनिक परिवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.

या गौरव सोहळ्यात अहिल्यानगर जिल्ह्याचा अभिमान असलेले कारगिल हिरो एकनाथ पवार, तसेच शहीद जवक अंकुश दादाभाऊ यांच्या वीरपत्नी सौ. कल्पना जवक आणि शहीद भानुदास गायकवाड यांच्या वीरपत्नी सौ. मीनाबाई गायकवाड यांचा महामहिम राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला. राज्यस्तरावर झालेला हा गौरव अहिल्यानगर जिल्ह्यासाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब ठरली.

यापूर्वी अहिल्यानगर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्कॉड्रन लीडर विद्यासागर कोरडे यांनीही या वीरांचा सन्मान करून जिल्ह्याच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली होती. आता राज्य शासनानेही त्याच शौर्याला सलाम करत या वीरांना सन्मानित केल्याने त्यांच्या बलिदानाला संपूर्ण महाराष्ट्राने मानवंदना दिली.500सन १९९९ मध्ये कारगिलच्या दुर्गम, हिमाच्छादित पर्वतरांगांमध्ये भारतीय जवानांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शत्रूचा पराभव करून प्रत्येक शिखरावर तिरंगा फडकवला. अनेक जवानांनी आपल्या प्राणांची आहुती देत राष्ट्राच्या अखंडतेचे रक्षण केले. त्या शौर्यगाथेची आठवण म्हणून दरवर्षी २६ जुलै हा दिवस “कारगिल विजय दिवस” म्हणून देशभर साजरा केला जातो. हा दिवस केवळ विजयाचा नाही, तर त्याग, शौर्य आणि राष्ट्रनिष्ठेचा प्रेरणादायी इतिहास आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “देशाच्या संरक्षणासाठी सैनिक जीवाची बाजी लावतात. मातृभूमीसाठी प्राण अर्पण करणारा सैनिक कधीच मरत नाही; तो राष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाच्या हृदयात सदैव अमर राहतो.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारगिल युद्धातील सैनिकांच्या अद्वितीय पराक्रमाचा गौरव करत सांगितले की, “सैनिक अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवतो. दुर्गम, उभ्या कड्यांवर चढून शत्रूकडील ताब्यात गेलेली शिखरे पुन्हा जिंकून भारताचा तिरंगा फडकावणे हा जगाच्या लष्करी इतिहासातील अद्भुत पराक्रम आहे. आपल्या तरुण अधिकाऱ्यांनी आणि जवानांनी राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण केले. एखादा सैनिक शहीद झाला तरी त्याचा परिवार एकटा राहत नाही; संपूर्ण महाराष्ट्र हेच त्याचे कुटुंब असते आणि त्या कुटुंबाची जबाबदारी शासन व समाज मिळून उचलतो.”

महामहिम राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी कारगिल युद्धातील शौर्य, वीरपत्नींचा त्याग आणि सैनिक परिवारांचे योगदान यांचे मनापासून कौतुक केले. अल्पावधीत उत्कृष्ट नियोजन करून हा गौरव सोहळा यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल त्यांनी सैनिक कल्याण विभागाचे अभिनंदन केले. कारगिल परिसरातील कठीण भौगोलिक परिस्थिती आणि युद्धातील अनुभवांचा उल्लेख करत त्यांनी उपस्थितांना राष्ट्रसेवेची प्रेरणा दिली.

कार्यक्रमात उपस्थित प्रत्येक वीर, वीरपत्नी आणि सैनिक परिवाराचा सन्मान करताना लोकभवन दरबार सभागृहात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले. उपस्थितांनी उभे राहून शहीद जवानांना मानवंदना अर्पण केली.

अहिल्यानगरच्या वीरांचा राज्यस्तरीय गौरव हा केवळ एका जिल्ह्याचा सन्मान नसून संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे. कारगिलचे शौर्य, सैनिकांचे बलिदान आणि वीर कुटुंबांचा त्याग हा देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आहे. अशा शूरवीरांमुळेच भारताचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व आणि तिरंग्याचा मान आजही अभिमानाने उंच फडकत आहे. “जोपर्यंत भारतभूमी आहे, तोपर्यंत कारगिलच्या वीरांचे शौर्य आणि बलिदान प्रत्येक भारतीयाच्या हृदयात अमर राहील.”500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या