बोरीतील २०२ कुटुंबांना संविधान उद्देशिकेचे वाटप ; समाज कल्याण विभागाच्या योजनांची दिली माहिती
B1न्यूज मराठी नेटवर्क
धाराशिव : प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेअंतर्गत निवड झालेल्या तुळजापूर तालुक्यातील बोरी गावातील कुटुंबांना आज सोमवारी (ता. २०) भारतीय संविधान उद्देशिकेचे वाटप करण्यात आले. समाज मंदिरात आयोजित कार्यक्रमात समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांवरील माहितीपर घडीपुस्तिका व पॉकेट बुकचेही वितरण करण्यात आले.
कार्यक्रमास समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, समाज कल्याण निरीक्षक अतुल जगताप, सरपंच श्रीकांत हावळे,उपसरपंच नारायण जानराव, पोलीस पाटील प्रवीण जानराव, ग्रामपंचायत सदस्या प्रेमा हावळे तसेच ग्रामपंचायत सचिव श्रीमती. ए.डी. थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांनी सांगितले की,समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती व बौद्ध समाजाच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येतात. लाभार्थ्यांनी या योजनांची सविस्तर माहिती घेऊन त्यांचा लाभ घ्यावा आणि आपल्या जीवनमानाच्या उन्नतीसाठी त्याचा प्रभावी उपयोग करावा.
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते कुटुंबप्रमुखांना भारतीय संविधान उद्देशिका,समाज कल्याण विभागाच्या महत्त्वपूर्ण योजनांवर आधारित ‘समता दिनदर्शिका’, ‘आत्मनिर्भर’ घडीपुस्तिका, सर्वसाधारण योजनांची माहिती देणारी ‘विकासवाटा’ घडीपुस्तिका तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यावरील पॉकेट बुक यांचे वितरण करण्यात आले.
बोरी गावातील सर्व २०२ कुटुंबांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून संविधान उद्देशिका व माहितीपर साहित्याचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.





