आषाढी वारी २०२६: जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी

0

“पालखी मार्ग, विसावा, मुक्काम आणि रिंगण या सर्व ठिकाणी स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे” – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

B1न्यूज मराठी नेटवर्क500

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर दिनांक १४ जुलैपासून वारी संपेपर्यंत पंढरपूर येथे मुक्कामी राहणार

सोलापूर / पंढरपूर : आषाढी वारी २०२६ च्या अनुषंगाने दहा मानाच्या पालख्यांसोबत अन्य पालख्याही पंढरपूरकडे निघालेल्या आहेत. श्री संत ज्ञानेश्वर महाराज तसेच श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयीसुविधांबाबतची कामे दिलेल्या सूचनांप्रमाणे होत आहेत की नाही, याची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी माळशिरस तालुक्यातील दोन्ही पालखी मार्गांची पाहणी केली. तसेच मुक्काम, विसावा व रिंगण या ठिकाणांना भेटी देऊन मार्गदर्शक सूचना दिल्या.

बोंडले येथे दिलेल्या सूचना:
बोंडले येथे पाहणी करताना जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी विसाव्याच्या ठिकाणी व रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, तसेच स्वच्छता व्यवस्था ठेवण्याबाबत निर्देश दिले. बोंडले येथे इमर्जन्सी ऑपरेटिंग सेंटरचे (EOC) काम त्वरित पूर्ण करावे आणि पालख्या बाहेर पडण्याच्या मार्गावर मुरूम टाकावा. महामार्गावर आवश्यकतेनुसार रम्बलर व गतिरोधक बसवावेत, तसेच क्रॅश बॅरियर्स व इतर सुरक्षा उपाययोजना करण्याबाबतही त्यांनी निर्देशित केले.

वेळापूर येथील पाहणी:
वेळापूर येथे रस्त्याची पाहणी करताना जिल्हा परिषदेने मंजूर केलेल्या दोन्ही रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत, पालखीतळाचे मुरमीकरण व सपाटीकरण करावे, जर्मन हँगरचे काम लवकर पूर्ण करावे व जर्मन हँगरच्या बाजूला असलेला मोठा खड्डा तात्काळ बुजवण्याबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिले. तसेच पाटबंधारे विभागाच्या जागेची पूर्ण स्वच्छता करावी व झाडांच्या फांद्या कापण्याबाबतही त्यांनी सांगितले. पुरंदावडे येथे होणाऱ्या गोल रिंगणाच्या अनुषंगाने मुरमीकरण व सपाटीकरण करावे, गवत काढून तात्काळ स्वच्छता करण्याबाबत त्यांनी सूचित केले.

माळशिरस येथील सूचना:
माळशिरस येथे आपत्कालीन नियंत्रण केंद्राचे काम तात्काळ पूर्ण करावे. स्वच्छतागृहे व स्नानगृहांची उभारणी त्वरित झाली पाहिजे. वारकरी सुविधा केंद्राच्या जागेचे मुरमीकरण व सपाटीकरण करून स्वच्छता ठेवावी. बारिक स्वच्छतागृहापर्यंत जाण्यासाठी मुरमीकरण करून घ्यावे. या सर्व कामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्ध केलेल्या निधीचा योग्य पद्धतीने विनियोग करावा व केलेल्या कामांचे जिओ टॅगिंग करून छायाचित्रे काढावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिल्या.

याच पद्धतीने नातेपुते, अकलूज, बोरगाव, सदाशिवनगर येथील पालखी मुक्काम, विसावा व रिंगण ठिकाणांची पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कामे करून घेण्याबाबत सूचित केले.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या अनुक्रमे १९ व २० जुलै रोजी सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत आगमन करत आहेत. त्या दृष्टीने सर्व कामे त्वरित पूर्ण झाली पाहिजेत, यासाठी सर्व यंत्रणा प्रमुखांनी कामाचे नियोजन करावे. यावेळी येणाऱ्या पालख्यांमधील तसेच वारकरी भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, या दृष्टीने सर्वांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सांगितले.500आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक-वारकरी येणार आहेत. त्या दृष्टीने सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी त्यांच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी. भाविक-वारकऱ्यांना स्वच्छ पाणी, शौचालये आणि पालखी मार्गाबरोबरच पालखी मुक्काम, विसावा व रिंगण या सर्व ठिकाणी स्वच्छता योग्य पद्धतीने राखली जाईल, या दृष्टीने सर्व यंत्रणांनी परस्परांशी समन्वय ठेवावा व एकही वारकऱ्याची गैरसोय होणार नाही, या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे सांगून दिनांक १४ जुलै ते वारी संपेपर्यंत आपण पंढरपूर येथेच मुक्कामी असल्याचेही त्यांनी सांगितले. या दरम्यान कोणालाही कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांशी किंवा माझ्याशी संपर्क करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

या पाहणी दौऱ्यात माळशिरसच्या उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे नोडल अधिकारी अमित माळी, तहसीलदार सुरेश शेजुळ यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या