जिद्द, चिकाटी आणि परिस्थितीची जाणीव असेल तर ध्येय निश्चित : मेजर राहुल होनमाने

B1न्यूज मराठी नेटवर्क
मालवंडी : देश सेवेत भरती झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
‘मालवंडी भुषण’ पुरस्काराचे वितरण
बार्शी : आपल्या परिस्थितीची जाणीव असेल आणि ध्येय निश्चित असेल तर यश नक्कीच मिळते. कोणत्याही पदावर पोहचलो तरी पाय जमीनीवर असले पाहिजेत.आई, वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून ध्येय साध्य करण्याकडे वाटचाल करायला हवी. प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर यश हमखास मिळते. असे मत मेजर राहुल होनमाने यांनी मालवंडी येथे व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक व बहुउद्देशीय संस्था तसेच आनंदराव पाटील विद्यालय मालवंडी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मालवंडी भुषण’ पुरस्काराचे वितरण बुधवारी झाले. यावेळी मेजर होनमाने बोलत होते.
भारतीय सैन्यात भरती झालेले, आनंदराव पाटील विद्यालयातील माजी विद्यार्थी, मालवंडीचे सुपुत्र मेजर राहुल होनमाने, मेजर लक्ष्मण माने, महाराष्ट्र सुरक्षा दल निखील काटे यांना ‘मालवंडी भुषण’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
‘मालवंडी भुषण’ पुरस्काराचे हे पहिले वर्ष असून संस्थेच्या वतीने २०१६ पासून सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविले आहेत. यासाठी संस्थेचे पदाधिकारी, सदस्य व गावकरी यांचे मोठे योगदान आहे. प्रशासकीय, देश सेवेच्या पुढील कार्यासाठी यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या.
मालवंडी येथे पाटील विद्यालयात झालेल्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक व बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष समाधान काटे, मुख्याध्यापक विजयकुमार कुलकर्णी, उपाध्यक्ष प्रविण पाडुळे, सदस्य किरण कदम, गणेश खंडागळे, हाजिम शेख, महेश बीडकर, सर्व शिक्षक शहाजी भोसले, हरिश्चंद्र चिकणे, भाऊ वाघमोडे, महादेवी सांडे, इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.