कवी कालिदास मंडळाच्या अध्यक्षपदी आबासाहेब घावटे
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : कवी कालिदास मंडळाच्या नूतन वर्षाच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच मंडळाच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये एकमताने निवड करण्यात आली. मंडळाच्या अध्यक्षपदी प्रथितयश कथा आणि बाल कथा लेखक, कवी आबासाहेब घावटे तर उपाध्यक्ष पदी ज्येष्ठ कवयित्री आणि लेखिका सौ सुमन चंद्रशेखर यांची नियुक्ती झाली. कार्याध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश गव्हाणे तर सचिव म्हणून कवयित्री अर्चना पोळ यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली.
यावेळी मावळते अध्यक्ष कवी, लेखक रामचंद्र इकारे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मान केला. गेली 35 वर्षे साहित्य क्षेत्रात सातत्याने कार्यरत असणाऱ्या आणि नवोदित कवींना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या कवी कालिदास मंडळाचा आषाढाच्या पहिल्या रविवारी होणारा कवी कालिदास महोत्सव अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण असतो. यावेळी वितरित केले जाणारे राज्यस्तरीय मेघदूत पुरस्कार हे काव्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचे पुरस्कार समजले जातात.
‘मंडळाची ही वैभवशाली परंपरा पुढे चालवण्याचा किंबहुना ती अधिक समृद्ध करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू’ असे मनोगत नूतन अध्यक्ष आबासाहेब घावटे यांनी व्यक्त केले. यावेळी मंडळाचे नूतन पदाधिकारी सौ सुमन चंद्रशेखर, प्रकाश गव्हाणे, अर्चना पोळ यांनीही समयोचित विचार मांडले. कार्यकारिणी सदस्य मुकुंदराज कुलकर्णी, दत्ता गोसावी,रामचंद्र इकारे,प्रा.रविराज फुरडे, शिवानंद चंद्रशेखर यांनी आपले मनोगत व्यक्त करून नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.




