समाधान शिबिरातून नागरिकांच्या प्रश्नांना दिलासा; सेतूच्या दाखल्यापासून बिनव्याजी कर्जापर्यंत विविध सेवांचा लाभ
‘श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत समाधान शिबिर
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाच्या वतीने विविध ठिकाणी समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरांमधून नागरिकांना सेतू केंद्रातील दाखल्यांपासून ते शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार नीलेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या समाधान शिबिरांमध्ये मंडल स्तरावर नागरिकांना उत्पन्न, जात आदी महत्त्वाचे दाखले देण्यात येणार आहेत. तसेच सातबारा वाचन आणि ‘जिवंत सातबारा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. गरजू कुटुंबांना नवीन रेशनकार्डचे वितरण करण्यात येणार असून संजय गांधी निराधार योजना अंतर्गत लाभार्थ्यांनाही मदत मिळवून देण्यात येणार आहे.
याशिवाय आरोग्य विभागाच्या माध्यमातून नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. पोस्ट कार्यालय, बँका, सहकार विभाग, कृषी विभाग आदी शासकीय यंत्रणांच्या योजनांची माहिती व लाभ पात्र नागरिकांना देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पात्र शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याची सुविधाही या शिबिरांमधून दिली जाणार आहे.
या शिबिरात आरटीओ, मुद्रांक विभाग, महावितरण, महिला व बालकल्याण विभाग, ग्रामपंचायत विभाग तसेच बांधकाम विभागही सहभागी होणार आहेत. नागरिकांच्या वैयक्तिक तसेच सामूहिक योजनांच्या अर्जांवर त्वरित कार्यवाही करण्याचा प्रयत्न या अभियानातून होणार असल्याचे तहसीलदार पाटील यांनी स्पष्ट केले.
या अभियानाअंतर्गत ७ मार्च रोजी तिहे कोंडी, १४ मार्च रोजी बडाळा व मार्डी, १० एप्रिल रोजी बाळे व शेळगी, १७ एप्रिल रोजी सोरेगाव, ८ मे रोजी सोलापूर शहरात तसेच १५ मे रोजी मजरेवाडी येथे समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांमुळे नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी आणि त्वरित मिळण्यास मोठी मदत होणार आहे.





