डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावेत
B1न्यूज मराठी नेटवर्क
रायगड-अलिबाग : रायगड जिल्हयातील ग्रामीण भागातील अनुसूचित जाती, जमातीच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून जीवनमान उंचावणे हा उद्देश समोर ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सुरू करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद, रायगड मार्फत या योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार असून पात्र शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत. या योजनेंतर्गत नवीन विहीरीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना 4 लाख, जुनी विहीर दुरूस्ती 1 लाख, शेततळे प्लास्टीक अस्तरीकरण 2 लाख, वीज जोडणी आकार 20 हजार, पंपसंच 40 हजार, तुषार सिंचन 47 हजार, ठिबक सिंचन 97 हजार, यंत्रसामुग्री 50 हजार, पीव्हीसी/एचडीपीई पाईप 50 हजार, परसबागेसाठी 5 हजार, विंधन विहीरीसाठी 50 हजार पर्यंतचे थेट अनुदान मिळणार आहे.
योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचे पात्रता निकष जारी करण्यात आले आहेत जसे की अर्जदार अनुसूचित जाती/नवबौध्द/अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा त्यासाठी जातीचे प्रमाणपत्र आवश्यक, जमीनधारणेचा 7/12 दाखला व 8 अ उतारा असणे आवश्यक आहे. जमीनधारणा 0.40 हे ते 6.00 हे पर्यंत मर्यादित असावी.
शेतक-यांनी योजनांचा लाभ घेण्यासाठी महा-डीबीटी पोर्टलचे http://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/Login, या संकेतस्थळावर अर्ज दाखल करावा. या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज स्वीकृतीपासून लाभार्थ्यांना अनुदान अदा करण्याची सुविधा पोर्टलद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. एकत्रित संगणकीय सोडत पध्दतीने लाभार्थी निवडण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात घ्यावा व अधिक माहितीसाठी तालुकास्तरावरील पंचायत समितीच्या कृषि अधिकाऱ्यांशी संपर्क करावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत बडे, कृषि विकास अधिकारी पवनकुमार नजन व जिल्हा कृषि अधिकारी (विघयो) कु.निकिता सुर्यवंशी यांनी केले आहे.




