ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे 290 एकर ऊस आगीपासून वाचविण्यात ग्रामस्थांना यश
B1न्यूज मराठी नेटवर्क
वैराग : शुक्रवार दिनांक 10/10/2025 रोजी वैराग पोलिस स्टेशन हद्दीतील आंबेगाव ता. बार्शी जिल्हा_ सोलापूर, गावातील बालाजी झेंडे, ब्रह्मदेव झेंडे व श्रीमंत माळी यांच्या ऊसाला सकाळी 10:40 वाजता शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली आहे,हे कळताच गावचे पोलीस पाटील राजाभाऊ दळवे यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाइन (18002703600) नंबरवरून ही माहिती संपूर्ण गावाला कळवली आणि काही वेळातच तेथे गावातील गावकरी मदतीसाठी धावले व उसाला लागलेली आग ग्रामस्थांच्या मदतीने विझवण्यात यश आले, व उर्वरित 290 एकर ऊस आगीपासून वाचविण्यात यश आले.
सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस दल व जिल्हा परिषद सोलापूर यांचा संयुक्त उपक्रम असणाऱ्या ग्रामसुरक्षा यंत्रणेत जिल्ह्यातील 1030 गावे सहभागी आहेत.जिल्ह्यातील 11.61 लाख नागरिक यंत्रणेत सहभागी आहेत.आजवर जिल्ह्यात 19190 वेळा यशस्वी वापर करण्यात आला आहे.
संकट काळात आपत्तीग्रस्त नागरिकाने ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री नंबर 18002703600/9822112281 वर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना कॉल स्वरूपात तत्काळ ऐकवला जात असल्याने गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होतआहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेचा यशस्वी वापर करण्याबाबतचे निर्देश जिल्हा परिषद कार्यालय व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्याकडून देण्यात आले आहेत.
ग्राम सुरक्षा यंत्रणेची उद्दिष्ट
घटनाग्रस्त नागरिकांना परिसरातील नागरिकांची तातडीने मदत मिळणे.
गावातील कार्यक्रम / घटना विना विलंब नागरीक/ग्रामस्थांना एकाच वेळी कळवणे.
अफवांना आळा घालणे.
प्रशासनाला नागरिकांशी जलद संवाद साधता येणे.
पोलीस यंत्रणेस कायदा व सुव्यस्था कायम राखणे कामी नागरिकांचे सहकार्य मिळणे.
ग्राम सुरक्षा यंत्रणेची वैशिष्ट्ये
संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा
गावासाठी यंत्रणा सुरु करणे व सहभागी होण्यासाठी सोपी पद्धत
संपूर्ण भारतासाठी एकच टोलफ्री नंबर 18002703600/9822112281
यंत्रणेत सहभागी असलेला कोणताही नागरिक आपत्ती काळात संपूर्ण परिसराला सावध करू शकतो.
संदेश देणाऱ्या व्यक्तीच्या आवाजातच संदेश कॉल स्वरुपात परिसरातील नागरिकांना मिळतो.
दुर्घटनेचे स्वरूप, तीव्रता , ठिकाण कळल्याने गावकऱ्यांना विना विलंब व नियोजनबद्ध मदत करता येते.
नियमानुसार दिलेले संदेशच स्वयंचलित रित्या प्रसारित होतात
नियमाबाह्य दिलेले संदेश/ अपूर्ण संदेश रद्द होतात व प्रसारित होत नाहीत.
एका गावात चोरी करून चोर दुसऱ्या गावच्या दिशेने गेल्यास त्या गावालाही सावध करणे शक्य.
वाहन चोरीचा संदेश आजूबाजूच्या 10 किमी परिसरातील सर्व दिशांच्या गावांना तत्काळ मिळतो.
घटनेच्या तीव्रतेनुसार कॉल रिसीव्ह होत नाही,तोपर्यंत रिंग वाजते.
संदेश पुढील 1 तास पुन्हा पुन्हा ऐकण्याची सोय. कोणत्याही वेळी आपल्यासाठी संदेश तपासण्याची सोय.
चुकीचा संदेश किंवा मिसकॉल देणारे नंबर आपोआप Black List होतात.
गावाबाहेर दुसऱ्या गावात अपघातग्रस्त नागरिकाचा संदेश घटना घडलेल्या परिसरातही प्रसारित होतात.
सरकारी कार्यालये/ पोलीस स्टेशन आदींना आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना किंवा विशिष्ट एक किंवा एकापेक्षा जास्त गावांना किंवा कर्मचाऱ्यांना सूचना / आदेश देता येणे शक्य होत आहे.




