रब्बी २०२५–२६ हंगामासाठी पीक प्रात्यक्षिकांसाठी शेतकरी गटांना अर्ज करण्याचे आवाहन
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान अंतर्गत अन्नधान्य, वाणिज्यिक पीके आणि राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत तेलबिया पिकांसाठी रब्बी हंगाम २०२५–२६ मध्ये पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. गहू, कडधान्य, पौष्टिक तृणधान्य, ऊस, करडई, मोहरी व सूर्यफूल या पिकांच्या उत्पादकतेसाठी आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी गटांनी या योजनेंतर्गत अर्ज करून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले केले आहे.
सदर प्रात्यक्षिकांसाठी दि. ३१ मार्च २०२४ पूर्वी शासकीय यंत्रणेकडे नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी व कृषी क्षेत्रातील सहकारी संस्था पात्र आहेत. प्राधिकृत सदस्याने महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करावा. अर्ज सादरीकरणाची सुविधा दि. २ सप्टेंबर २०२५ पासून उपलब्ध असून, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) या तत्त्वावर गटांची निवड होणार आहे.
अर्ज करताना https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/Agrilogin या संकेतस्थळावर बियाणे वितरण, प्रात्यक्षिक, फ्लेक्सी घटक, औषधे आणि खते या टाईल अंतर्गत अर्ज करता येतील. अर्जदार गट सदस्यांचा Farmer ID असणे आवश्यक आहे.




