आणीबाणीच्या काळात बंदिवास भोगलेल्या नागरिकांचा प्रभारी जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांच्या हस्ते गौरव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र वितरण
B1न्यूज मराठी नेटवर्क
लातूर, दि. २५ : देशात २५ जून १९७५ रोजी लागू झालेल्या आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात बंदिवास भोगलेल्या व्यक्तींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागला. या व्यक्तींचा शासनातर्फे सन्मान करताना त्यांनी संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव केला जात आहे, असे प्रभारी जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांनी सांगितले.
आणीबाणीच्या काळात बंदिवास भोगलेल्या व्यक्तींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र वितरित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रभारी जिल्हाधिकारी करमरकर बोलत होत्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी संगीता टकले, अहिल्या गाठाळ, गणेश पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी व्यंकट रावलोड, तसेच आणीबाणीच्या काळात बंदिवास भोगलेले माजी आमदार मनोहर पटवारी, प्रदीप पाटील खंडापूरकर, सुभाष निंबाळकर, अनिल अंदोरीकर, अशोक मठपती आदी उपस्थित होते.
आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांचे आणि अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी अनेकांनी लढा दिला. त्यांना बंदिवास भोगावा लागला. संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेला लढा, त्याग आणि महत्त्वपूर्ण योगदान कधीही विसरता येणार नाही, असे प्रभारी जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांनी नमूद केले.
आणीबाणीच्या ५०व्या वर्षपूर्तीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी केले. त्यांनी या संदर्भात आयोजित विविध कार्यक्रमांची माहिती दिली. आणीबाणीच्या काळात बंदिवास भोगलेल्या सुभाष निंबाळकर, अनिल अंदोरीकर आणि अशोक मठपती यांनी आपले बंदिवासातील अनुभव कथन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय सूर्यवंशी यांनी केले.