विभागाने द्वारपोच चिकित्सा सेवा द्यावी – मंत्री पंकजा मुंडे

0

गोशाळा नोंदणीचे प्रमाणपत्र वाटप

B1न्यूज मराठी नेटवर्क

अमरावती : शासनाच्या प्रयत्नाने शेतकऱ्यांचा पशू पालनाकडे कल वाढत आहे. पशूसंवर्धन विभागाने या पशूंच्या आरोग्याची काळजी घ्यावी. आवश्यकता भासल्यास विभागाने पशूंच्या चिकित्सेसाठी द्वारपोच सेवा द्यावी, असे निर्देश पशूसंवर्धन व पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.

आज पशूसंवर्धन विभागाचा आढावा घेण्यात आला. यावेळी पशू संवर्धन विभागाचे डॉ. वाय. एस. वंजारी, डॉ. शशिकांत कानफाडे, डॉ. संदिप इंगळे, डॉ. शिवेंद्र महल्ले, डॉ. सुधीर चौधर, डॉ. राजेंद्र पेठे, डॉ. दिलीप देशमुख आदी उपस्थित होते.

श्रीमती मुंडे म्हणाल्या, पशूंच्या आरोग्याची चांगल्या पद्धतीने काळजी घ्यावी. जिल्ह्यात प्रयोगशाळा आणि चिकित्सागृह असावेत, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. प्रामुख्याने तालुकास्तरावर घरपोच सेवा देण्यात यावी. गोशाळांमध्ये चांगल्या दर्जाच्या सुविधा असाव्यात. गोशाळेला तारेचे कुंपण घालण्यात यावे. याठिकाणी दाखल होणाऱ्या पशूंना योग्य उपचार करण्यात यावे.

देशी गाय परिपोषण योजनेतून तीन हजारावर गायींना अनुदान देण्यात आले आहे. त्यासोबच मानव विकासमधून दुधाळ जनावरे वाटप आणि प्रशिक्षण देण्यात येत आहे. या वाटप करण्यात आलेल्या जनावरांची माहिती ठेवावी. तसेच त्यांना आवश्यक असलेली मदत पुरविण्यात यावी. दुधाळ जनावरांना वैरणाची आवश्यकता असल्याने वैरण विकास कार्यक्रमामधून कामे घेऊन चाऱ्याची व्यवस्था करण्यात यावी. महामेष योजनेतून 217 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. यावर विशेष लक्ष ठेवण्यात यावे. यावेळी श्रीमती मुंडे यांच्या हस्ते गोशाळा नोंदणीचे प्रमाणपत्र प्राधिनिधीक स्वरूपात वाटप करण्यात आले.

यानंतर त्यांनी पर्यावरण विभागाचा आढावा घेतला. महानगरपालिका क्षेत्रात सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या यंत्रणेची कार्यक्षमपणे हाताळणी करावी. प्रामुख्याने नागरी क्षेत्रात पाण्यावर प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी संबंधित यंत्रणेला सूचविण्यात यावे. विभागातील सांडपाणी प्रक्रियेसाठी लागणारे पाणी गोळा करण्यासाठी संबंधित पालिकांना व्यवस्था करण्यास सांगावे. उद्योग क्षेत्रात वायू आणि जलप्रदूषणाच्या तक्रारी येतात. या तक्रारींची तातडीने दखल घेऊन त्याबाबत उपाययोजना करण्यास प्रकल्पांना सांगावे. अमरावतीमध्ये वस्त्रोद्योग आहे. त्याठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा तपासण्यात यावी. वीज निर्मिती केंद्रामधून वायू प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी येतात. त्यामुळे प्रकल्पामधून निघणारी राख आणि सांडपाण्याचे नियोजन करावे, असे निर्देश श्रीमती मुंडे यांनी दिले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या