तीन महिन्यांचे अन्नधान्य आगाऊ वाटप लाभार्थ्यांना वेळेत लाभ घेण्याचे आवाहन

B1न्यूज मराठी नेटवर्क
अहिल्यानगर : पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या प्रतिकूल हवामानामुळे अन्नधान्य वितरणात अडथळा येऊ नये, म्हणून केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम (NFSA) अंतर्गत ऑगस्ट २०२५ पर्यंतच्या अन्नधान्याचे आगाऊ वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात ३० मे २०२५ पर्यंत धान्याची उचल पूर्ण करणे आणि ३० जून २०२५ पर्यंत वाटप पूर्ण करणे आवश्यक आहे. जून, जुलै आणि ऑगस्ट २०२५ या तीन महिन्यांचे अन्नधान्य लाभार्थ्यांना एकत्रितपणे मिळणार असुन लाभार्थ्यांनी वेळेत अन्नधान्य उपलब्ध करुन घेण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी, अहिल्यानगर यांनी केले आहे.
रास्तभाव दुकानदारांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत दुकान उघडे ठेवावे आणि दुकानाच्या दर्शनी भागात या तीन महिन्यांच्या अन्नधान्य वाटपाबाबतचा फलक लावावा. अन्नधान्याचे वितरण ई-पॉस मशिनद्वारेच करण्यात येणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्यासाठी स्वतंत्र बायोमेट्रिक (अंगठा) प्रमाणीकरण करणे आवश्यक असल्याचेही कळविण्यात आले आहे.