मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पणन विभागाच्या १०० दिवसांच्या आराखड्याचा आढावा घेतला.

B1न्यूज मराठी नेटवर्क
परभणी : दरवर्षी पणन विभागामार्फत सोयाबीनची खरेदी केली जाते. ही खरेदी कोणत्याही अडथळ्याशिवाय होण्यासाठी विभागाने कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी. पुढील वर्षापासून राज्यात नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या सोयाबीन खरेदीसाठीची तयारी आणि शेतकऱ्यांची नोंदणीही ऑक्टोबरमध्ये पूर्ण करावी. सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी उभारण्यात येणाऱ्या व्यवस्थेचे निकष ठरवावे. त्यामध्ये सर्व सोयी सुविधांचा अंतर्भाव असावा. कोणत्याही अडचणीशिवाय सोयाबीन खरेदी सुरू राहिली पाहिजे अशी यंत्रणा उभी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
समृध्दी महामार्गालगत मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत ॲग्रो हब उभे करावेत. या ठिकाणी सर्व-सोयी सुविधा उभारण्यात याव्यात. या ॲग्रो हबसाठीचा आराखडा तयार करून सादर करावेत. राज्यातील चारही विभागात उभारण्यात येणाऱ्या ॲग्रो लॉजिस्टिक हबचा प्रस्ताव सादर करावा. कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळ हा उत्तम पर्याय असून त्यासाठी जास्त मागणीही आहे. त्यामुळे कांदा चाळींची संख्या वाढवावी अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या.
कोकण भागात माशांसाठी तर आदिवासी भागात तेथील स्थानिक उत्पादनासाठी बाजार समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मेघना साकोरे – बोर्डीकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पणन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्यासह विविध विभागांचे प्रधान सचिव, अपर मुख्य सचिव, सचिव उपस्थित होते.