संविधान बदलण्याचे नरेटिव्ह पसरवणारेच संविधान विरोधी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

B1न्यूज मराठी नेटवर्क
मुंबई दि.13 – महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान हे सर्व जाती धर्मीयांना न्याय देणारे संविधान आहे.भारताचे संविधान कधी ही बदलले जाणार नाही.मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अन्य विरोधकांनी संविधान बदलले जाईल अशा खोट्या अफवा पसरवल्या. संविधान बदलण्याचे नरेटिव्ह पसरवणारेच संविधान विरोधी आहे.संविधान बदलण्याचे फेक नरेटिव्ह पसरवणारे लोकच समाजात फुट पाडत आहेत. असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजीक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.
मुंब्रा येथे धम्म चक्र प्रवर्तन कट्टाचे ना.रामदास आठवले यांच्या हस्ते आज लोकापर्ण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे यांच्या निधीतुन मुंब्रा पोलिस स्टेशन जवळ धम्मचक्र प्रवर्तन कट्टा उभारण्यात आलेला आहे. या कट्ट्यात ग्रंथालय वाचनालय आणि बैठकांसाठी हा कट्टा बहुउपयोगी ठरेल असे ना.रामदास आठवले म्हणाले.
यावेळी रिपब्लिकन पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भास्कर वाघमारे,बापु मखरे,भाजपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले,नितीन मोरे,योगेश भुजबळ आदि अनेक मान्यंवर उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे संविधान मजबुत करणारे नेते आहेत.मोदींच्या मंत्री मंडळाचा मी एक भाग आहे.त्यामुळे संविधानला कोणीही हात लावणार नाही त्या बद्दक निश्चित रहा. केंद्रात मी मंत्री झाल्यापासुन देशभरात रिपब्लिकन पक्ष वाढत आहे. सर्व जाती धर्मीयांनी रिपब्लिकन पक्षाला सहकार्य करावे.समाजात वाढत असणारे महिला अत्याचार रोखण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत. असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी यावेळी केले.